दुरवस्थेने प्रवाशांचे हाल
By Admin | Updated: July 25, 2014 00:27 IST2014-07-24T23:24:23+5:302014-07-25T00:27:59+5:30
कडा : आष्टी येथील बसस्थानकात वेळेवर स्वच्छता केली जात नसल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

दुरवस्थेने प्रवाशांचे हाल
कडा : आष्टी येथील बसस्थानकात वेळेवर स्वच्छता केली जात नसल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. अनेकदा स्थानकात अस्वच्छता असल्याने प्रवाशांना इमारतीबाहेर बसावे लागते. स्थानकाच्या आवारातही खड्ड्यामुळे अनेक ठिकाणी रस्ता चिखलमय झाला आहे.
आष्टी येथील बसस्थानक हे मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. येथील बसस्थानक तब्बल ४० वर्षापूर्वीचे आहे. येथे तालुक्यातील विविध ठिकाणचे ग्रामस्थ सातत्याने ये-जा करीत असतात. तसेच बीड, जामखेड, अहमदनगर आदी ठिकाणी ये-जा करणारे प्रवासीही येथे येत असतात. त्यामुळे येथे अनेकदा प्रवाशांना बसची वाट पहात तास ते दीड तास बसावे लागते.
बसस्थानकाच्या आवारात काही प्रवासी फळांच्या साली टाकतात. तसेच इतर प्लॅस्टिकचा कचराही येथे टाकला जातो. बसस्थानकाच्या आवारात वेळेवर स्वच्छता केली जात नसल्याने येथे येणाऱ्या प्रवाशांना घाणीची दुर्गंधी सहन करावी लागते. त्यामुळे येथे वेळेवर स्वच्छता करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी केली आहे.
यासह बसस्थानकाच्या आवारात काहींनी अनधिकृत अतिक्रमणही केले आहे. यामुळे बसस्थानकात बस येण्यासह अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे बसस्थानकाच्या आवारात झालेले अतिक्रमण हटविण्याची मागणी दादा जगताप यांनी केली आहे.
दरम्यान, येथील स्वच्छतेसह बांधकामासाठी दोन वेळेस बीओटी तत्वावर टेंडरही काढले होते. मात्र, या टेंडरमधील अटींची पूर्तता करणे, अवघड असल्याने टेंडर भरण्यास कोणीही धजावले नसल्याचीही येथे चर्चा असल्यााचे संजय खंडागळे यांनी सांगितले.
या बसस्थानकात प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याने येथे सोयी पुरवाव्यात अशी मागणी संगिता गिते यांच्यासह प्रवाशांमधून होत आहे.
बसस्थानकाच्या आवरात खड्डे पडले आहेत. यामध्ये माती जमा झाली आहे. आता पाऊस पडल्याने येथे चिखलही झाला आहे. त्यामुळे चालकांना बस चालविण्यासही अडचणी येत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, याबाबत आगारप्रमुख सचिन शिंदे म्हणाले की, स्वच्छतेचे टेंडर कोणी घेत नसल्याने काम रखडले आहे. (वार्ताहर)
बसस्थानकाच्या इमारतीला पावसाळ्यात गळती
बसस्थानकाच्या इमारतीला पावसाळ्यात गळतीही लागते. पाऊस पडल्यानंतर बसस्थानकाच्या इमारतीमध्ये पाणीही साचते. यामुळे बसस्थानकाच्या इमारतीत चिखलही होतो. यामुळे वेळप्रसंगी प्रवाशांना चिखलातही बसावे लागते.
बसस्थानकाची इमारत जीर्ण झाल्याने येते नवीन इमारत बांधण्याची मागणीही सामाजिक कार्यकर्ते दादा गव्हाणे यांनी केली आहे.