शेतीतील विज्ञानाकडे दुर्लक्षामुळे दुष्काळ
By Admin | Updated: June 27, 2016 01:02 IST2016-06-27T00:30:46+5:302016-06-27T01:02:00+5:30
औरंगाबाद : राजस्थानात ३०० मि. मी. पाऊस पडूनही तेथे पाणीपुरवठ्यावर एक रुपयाही खर्च करावा लागत नाही. त्या तुलनेत मराठवाड्यात पडणारा पाऊस किती तरी अधिक आहे

शेतीतील विज्ञानाकडे दुर्लक्षामुळे दुष्काळ
औरंगाबाद : राजस्थानात ३०० मि. मी. पाऊस पडूनही तेथे पाणीपुरवठ्यावर एक रुपयाही खर्च करावा लागत नाही. त्या तुलनेत मराठवाड्यात पडणारा पाऊस किती तरी अधिक आहे. तरी आपल्याकडे पाणीटंचाई जाणवते. शेती बेभरवशाची झाली आहे. त्याला प्रामुख्याने जुन्या शेती परंपरेतील विज्ञानाकडे झालेले दुर्लक्ष आणि शेतीचा नष्ट झालेला मूळ आधार या गोष्टी कारणीभूत आहेत. म्हणून सद्य:स्थितीवर मात करायची असेल तर येत्या काळात शेतीच्या परंपरा, त्यातील विज्ञान आणि जीवनपद्धती यांची सांगड घालावी लागेल, तसेच पावसाला सुसंगत पिके घ्यावी लागतील, असे मत शेती क्षेत्राचे अभ्यासक आणि उपविभागीय कृषी अधिकारी उदय देवळाणकर यांनी व्यक्त केले.
तरुण पत्रकारांच्या वतीने आयोजित अभ्यास वर्गात ते बोलत होते. ‘बेभरवासी पाऊस आणि मराठवाड्यातील शेती’ या विषयावर त्यांनी विस्तृत विवेचन केले. ते म्हणाले, दुष्काळ हा काही आजचा नाही. अगदी यंदाच्या दुष्काळापेक्षाही किती तरी वेळा औरंगाबादेत आणि मराठवाड्यात दुष्काळ पडल्याच्या इतिहासात नोंदी आहेत. परंतु त्यावेळी परंपरागत शेतीत एक अशी जीवनपद्धती अस्तित्वात होती की, ज्यामुळे दुष्काळावर मात करणे शक्य होते. आज आपल्याकडे सरासरी ७०० मि. मी. पाऊस पडतो. म्हणजे शेतीत एकरी ७० लाख लिटर पाणी पडते, पण दुर्दैवाने त्यातील २५ ते ३० लाख लिटर पाण्याचे बाष्पीभवन होते हे अभ्यासात आढळून आले आहे. पूर्वी बांधावर विशिष्ट प्रकारच्या वनस्पती असत. त्या जमिनीतील पाणी धरून ठेवत, बाष्पीभवनाचे प्रमाण कमी करीत. आज वनस्पतीही बदलल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून आज बाष्पीभवन ही शेतीसमोरील सगळ्यात मोठी समस्या बनली आहे. पूर्वी पाणवठे संरक्षित करण्याचे कौशल्य अवगत होते. शिवाय पशुआधारित शेती हा शेतीचा मूळ आधार होता. आता हा आधारच नष्ट झाला आहे. अलीकडच्या काळात उपलब्ध पाण्याचा विचार न करता पिके घेतली जात आहेत. कापूस हे सरासरी ७०० मि. मी. पावसावर येणारे पीक आहे. मात्र आपल्याकडे वैजापूरसारख्या ३०० मि. मी. सरासरी पाऊस असलेल्या तालुक्यातही कापसाचे क्षेत्र वाढते आहे.
यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. म्हणून येत्या काळात पाणी शेतात मुरेल अशा वनस्पती बांधावर लावाव्या लागतील. पावसाला सुसंगत अशी ४०० मि. मी.वर सरासरी येणारी पिके आणि २-३ महिन्यांत येणारी पिके यांची सांगड घालावी लागेल, तरच आपली शेती पुन्हा पूर्वपदावर येईल, असेही देवळाणकर म्हणाले.