लग्नसराईला दुष्काळाचा फटका

By Admin | Updated: November 18, 2015 00:40 IST2015-11-18T00:31:52+5:302015-11-18T00:40:06+5:30

राजकुमार जोंधळे , लातूर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने पडणाऱ्या दुष्काळाचा फटका यंदा लग्नसराईलाही बसल्याचे दिसून येत आहे़ तब्बल २७० दिवसांच्या लग्नसराईत ७४ विवाह

Due to the drought of the marriage season | लग्नसराईला दुष्काळाचा फटका

लग्नसराईला दुष्काळाचा फटका


राजकुमार जोंधळे , लातूर
जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने पडणाऱ्या दुष्काळाचा फटका यंदा लग्नसराईलाही बसल्याचे दिसून येत आहे़ तब्बल २७० दिवसांच्या लग्नसराईत ७४ विवाह तिथी आहेत़ प्रामुख्याने तुलसी विवाहानंतर लग्नसोहळ्याची धूम सुरु होते़ मात्र यंदा दुष्काळामुळे विवाह सोहळ्यांचे प्रमाण कमी आहे़ लातूर शहरातील ३५ मंगल कार्यालयात सरासरी ३० ते ३५ तारखांची नोंदणी महिनाभरापूर्वीच होत असे़ यंदा मात्र ही नोंदणी सरासरी १० वर आहे़ हा दुष्काळाचा फटका आहे़
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर, जळकोट, चाकूर, उदगीर, देवणी तालुक्यातील परिसर हा डोंगराळ आणि बालाघाटांच्या डोंगररांगांचा आहे़ परिणामी जिल्ह्यातील इतर तालुक्याच्या तुलनेत या परिसरात अल्प पाऊस असतो़ मात्र गेल्या तीन वर्षांपासून अत्याअल्प पावसामुळे दुष्काळ आहे़ अशा दुष्काळात उपवर मुला-मुलींचे विवाह जुळविणे कुटुंब प्रमुखाला अवघड झाले आहे़ दुष्काळामुळे नापिकी अन त्यातून कोलमडलेले अर्थकारण यामुळे आपल्या मुला-मुलींचा विवाह कसा उरकायचा ही चिंता बहुतांश जन्मदात्यांना सतावत आहे़ लातूर शहरात ३५ मंगल कार्यालये आहेत़ लग्नसराईत ही मंगल कार्यालये मिळणे मुश्किलीचे असते़ यंदा मात्र मंगल कार्यालयाच्या नोंदणीसाठी येणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे़ महत्त्वाच्या तारखेत तर एकाच दिवशी एकाच मंगल कार्यालयात वेळेचा मेळ घालून तीन-तीन विवाह सोहळे बुकिंग होतात़ यंदा अशी परिस्थिती नसल्याचे राहीचंद्र मंगल कार्यालयाचे अतुल देशमुख यांनी सांगितले़
अलीकडे लातूर जिल्ह्यात विविध समाजाच्या वतीने सामूहिक वधू-वर परिचय मेळावा आणि विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे़ आता या विवाहसोहळ्याचे महत्त्व अनेकांना पटू लागल्यामुळे अशा कार्यक्रमात कुटुंबांचा सहभाग वाढू लागला आहे़ यातून वधू आणि वर पित्याकडे कुटुंबाचा अनावश्यक खर्चाची बचत होऊ लागली आहे़ दुष्काळावर मात करण्यासाठी व मोठ्या खर्चाला फाटा देण्यासाठी उपवर वधू-वरांच्या पालकांना यामुळे दिलासा मिळाला आहे़ विविध समाजाच्या संस्था, संघटना अशा मेळाव्यांचे आयोजन करु लागले आहेत़ परिचय मेळाव्यातून लग्न जुळविण्याबरोबर विवाह सोहळे करण्याचा हा उपक्रम आहे़ शासनानेही सामुहीक विवाह सोहळ्याला बळ दिले असून, समाज कल्याण विभागाकडे अशा सोहळ्यांसाठी अनुदान देण्याची योजनाही आहे़
४जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने विवाह सोहळ्यांसाठी शुभमंगल योजनाही सुरु केली आहे़ या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना लग्नासाठी मदत करण्याचा उपक्रम बँकेमार्फत गेल्या दोन वर्षांपासून राबविण्यात येत आहे़

Web Title: Due to the drought of the marriage season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.