रेल्वे कर्मचा-यांच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 01:13 IST2017-10-27T01:13:49+5:302017-10-27T01:13:53+5:30
बुधवारची रात्र लासूर रेल्वेस्थानकावरील कर्मचा-यांसाठी चांगलीच धावपळीची ठरली. रात्रीची हुडहुडी भरविणा-या अंधारात सतर्कता आणि चपळता दाखवून कर्मचा-यांनी सात जणांना रेल्वे खाली येण्यापासून वाचविले.

रेल्वे कर्मचा-यांच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टळली
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : बुधवारची रात्र लासूर रेल्वेस्थानकावरील कर्मचा-यांसाठी चांगलीच धावपळीची ठरली. रात्रीची हुडहुडी भरविणा-या अंधारात सतर्कता आणि चपळता दाखवून कर्मचा-यांनी सात जणांना रेल्वे खाली येण्यापासून वाचविले.
सविस्तर घटना अशी की, मध्य प्रदेशातील खंडवा भागातील २० कामगार बुधवारी (दि.२५) रात्री लासूरला येण्यासाठी मनमाड येथून पुणे-निजामाबाद पॅसेंजर रेल्वेमध्ये बसले. मध्यरात्री १२.१७ वाजता ही पॅसेंजर लासूर स्थानकाच्या
प्लॅटफॉर्म दोनवर पोहोचली. तेथे आधीच मुंबईकडे जाणारी देवगिरी एक्स्प्रेस प्लॅटफॉर्म एकवर उभी
होती.
रात्री थंडी असल्यामुळे सर्व खिडक्या बंद केलेल्या होत्या. गाडी थांबल्यानंतर काही मिनिटांनी या कामगारांना कळाले की, लासूर स्टेशन आले आणि खाली उतरण्यासाठी त्यांच्यामध्ये एकच गोंधळ उडाला. घाई गडबडीमध्ये ते प्लॅटफॉर्मवर उतरण्याऐवजी दुस-या बाजूने खाली उड्या मारू लागले. मराठी येत नसल्यामुळे ते त्यांच्या भाषेत जोरात ओरडू लागले.
दुस-या बाजूने खडी असल्याने उडी मारल्यानंतर प्रवासी पडले होते. त्यामुळे त्यांचे डोके गाडीच्या चाकाखाली येण्याचा धोका निर्माण झाला असता. त्यांची आरडाओरड ऐकून स्टेशनवर असणारे रेल्वे सेना अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी, दिनेश व्यवहारे, स्टेशन मास्टर कमलकुमार, पॉइंटस्मन सीताराम पोळके यांनी त्वरित तिकडे रेल्वे पटरीकडे धाव घेतली. त्यांनी झटपट सात प्रवाशांना गाडीपासून दूर ओढले. त्यामुळे सामान्य खरचटण्याखेरीज कोणालाच गंभीर इजा झाली नाही. या चार कर्मचाºयांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली.