‘फासे पारधी’ समजून केले पोलिसांच्या हवाली
By Admin | Updated: August 10, 2015 00:57 IST2015-08-10T00:50:26+5:302015-08-10T00:57:09+5:30
उस्मानाबाद : पोटाची खळगी भरण्यासाठी दारोदार भिक्षा मागत बेंबळी येथे रविवारी सकाळी फिरणाऱ्या दोघांना, खेकडे पकडण्यासाठी शिंगोली

‘फासे पारधी’ समजून केले पोलिसांच्या हवाली
उस्मानाबाद : पोटाची खळगी भरण्यासाठी दारोदार भिक्षा मागत बेंबळी येथे रविवारी सकाळी फिरणाऱ्या दोघांना, खेकडे पकडण्यासाठी शिंगोली तांड्याच्या परिसरात फिरणाऱ्या तिघांना व येडशी येथे एकाला ‘फासे पारधी’ असल्याचा संशय घेत त्यांना पकडून नागरिकांनी पोलीस ठाण्यात नेले़ पोलिसांसमक्ष झालेल्या ओळखपरेडमध्ये तिन्ही ठिकाणच्या पाचही जणांची ओळख पटल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले़
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून ‘फासे पारधी’ आल्याची व लहान मुलांना पळवून नेणारी टोळी सक्रिय झाल्याची मोठी अफवा पसरली आहे़ गावातील प्रत्येक घरोघरी हा विषय चर्चिला जात आहे़ पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी अफवा असल्याचे सांगूनही नागरिकांच्या मनामध्ये पसरविलेल्या अफवेची अधीकच दहशत बसल्याचे दिसत आहे़ ‘फासे पारधी’ अफवेची दहशत किती मोठी पसरली आहे, याची प्रचिती रविवारी आली़ उस्मानाबाद तालुक्यातील समुद्रवाणी येथील दोन इसम रविवारी सकाळी बेंबळी गावातील घरोघरी,काही दुकानांमध्ये भिक्षा मागत होते़ त्या इसमांची वेषभूषा आणि डोळे पाहिल्यानंतर ते दोघे ‘फासे पारधी’ असल्याचा संशय काही नागरिकांना आला़ त्यांनी तत्काळ त्या दोघांना पकडून पोलीस ठाण्यात नेले़ पोलिसांनी त्या दोन इसमांची चौकशी केली़ विशेष म्हणजे काही वेळानंतर त्या इसमांना पाहण्यासाठी ठाण्यात आलेल्यांपैकी काहींनी ते समुद्रवाणीचे रहिवाशी असल्याचे सांगितले़ त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले़ शिंगोली तांडा परिसरात येडशी परिसरातील तिघे खेकडे धरण्यासाठी फिरत होते़ त्यांनाही नागरिकांनी चोरटे समजून पकडून शहर पोलिसांच्या ताब्यात दिले़ चौकशीनंतर त्यांची ओळख पटल्याने नागरिकांनी त्यांना सोडून दिले़ तर येडशी गावातही एका इसमाला चोर समजून दूरक्षेत्रात नेण्यात आले होते़ मात्र, चौकशीनंतर तो इसम नांदेड भागातील रहिवाशी असल्याचे समोर आले़ एकूणच रविवारी घडलेले प्रकार केवळ अफवेमुळे घडल्याचे दिसत आहे़