तीन लाख हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट...!
By Admin | Updated: July 9, 2017 00:34 IST2017-07-09T00:33:24+5:302017-07-09T00:34:43+5:30
जालना : जिल्ह्यात पावसाचा तब्बल वीस दिवस खंड पडल्याने सुमारे तीन लाख हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे.

तीन लाख हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट...!
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यात पावसाचा तब्बल वीस दिवस खंड पडल्याने सुमारे तीन लाख हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. पेरणी धोक्यात आली आहे. परिणामी गत वर्षीच्या समाधानकारक पावसामुळे दुष्काळातून सावरत असलेल्या शेतकऱ्यांच्या मनात पुन्हा दुष्काळ पडला तर, या विचाराने घालमेल सुरू आहे.
जिल्ह्यात यंदा सहा लाख हेक्टवर खरीप पेरणीचे नियोजन आहे. पैकी सात जुलैअखेर तीन लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. खरीप ज्वारीची सरासरीच्या १.९ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. कापसाच्या २९७९.९२ पैकी २३०४.६४ हेक्टरक्षेत्रावर लागवड झाली आहे. कापूस पिकाची उगवण चांगली झाली असून, पीक तीन ते चार पानावर वाढीच्या अवस्थेत आहे. कापूस पिकात आंतर मशागत कोळपणी, खुरपणीची कामे पूर्ण झाली आहे. खताची पहिली मात्रा देण्यात आली असून, कीटकनाशक फवारणी सुरू आहे. परंतु आता पावसाअभावी कापूस पिकाची वाढ खुंटली आहे. तुरीच्या ४८७.०७ हेक्टर क्षेत्रापैकी ४०७.५ हेक्टवर पेरणी झाली आहे. उडीद व मूग पिकाची अनुक्रमे ४६.३ व ६७.३ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. वाढीच्या अवस्थेत असलेल्या या पिकांना पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. बाजरी व मका पिकांची अनुक्रमे २१२.०१ व ३४३.०८ हेक्टवर पेरणी झाली आहे. वाढीच्या अवस्थेत पावसाने उघडीप दिल्याने खरिपाची सर्वच पिके धोक्यात आली आहेत. खरिप पिकांसाठी पावसाची आवश्यकता असल्याचा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने विभागीय स्तरावर पाठवला आहे. सर्वांच्या नजरा आता आभाळाकडे लागल्या आहेत.