औरंगाबाद : सिझेरीयन शस्त्रक्रियेनंतर कापसाचा बोळा पोटात राहिल्याने मातेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गंगापूर येथे घडली. तनुश्री ऋषीराज तुपे (२८ ) असे मृत मातेचे नाव आहे. याप्रकरणी मृताच्या नातेवाईकांनी डॉक्टरवर कर्तव्यात कसूर आणि मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, २३ जुलैला तनुश्री तुपे या गर्भवती महिलेस प्रसूतीसाठी गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉ. रवींद्र ठवाळ यांनी त्यांची सिझेरियन प्रसूती केली. तीन दिवसानंतर तनुश्रीला जुलाब व उलटीचा त्रास सुरु झाला. यामुळे डॉ रवींद्र यांनी तिला औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. मात्र उपचारादरम्यान २८ जुलैला तनुश्रीचा मृत्यू झाला.
दरम्यान, शवविच्छेदन अहवालात तनुश्रीचा मृत्यू सिझेरियन शस्त्रक्रिया दरम्यान कापसाचा बोळा पोटात राहिल्याने झाल्याचे स्पष्ट झाल्याचे नातेवाईकांनी सांगितले. यामुळे नातेवाईकांनी डॉ. रवींद्र ठवाळ यांच्या निष्काळजीपणामुळे तनुश्रीचा मृत्यू झाल्याचा आरोप करत त्यांच्यावर कर्तव्यात कसूर आणि मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी गंगापूर पोलीस स्थानकात निवेदनाद्वारे केली आहे. तनुश्री पश्चात दोन मुले असून एक मुल केवळ १० दिवसांचे आहे.