खचू नका, विधानसभा जिंकूया
By Admin | Updated: May 27, 2014 01:24 IST2014-05-27T01:21:02+5:302014-05-27T01:24:01+5:30
औरंगाबाद : हिंमत हारू नका, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज व्हा, या निवडणुका जिंकायच्याच अशा निर्धाराने कामाला लागा, असा संदेश आज येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना देण्यात आला

खचू नका, विधानसभा जिंकूया
औरंगाबाद : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमधील पराभवाने खचून जाऊ नका, हिंमत हारू नका, महाराष्टÑात होणार्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज व्हा, या निवडणुका जिंकायच्याच अशा निर्धाराने कामाला लागा, असा संदेश आज येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना देण्यात आला. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या ६९ व्या जयंतीनिमित्त सिडकोतील जगद्गुरू संत तुकाराम महाराज नाट्यगृहात दुपारी काँग्रेस कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब थोरात व शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी या मेळाव्यास मार्गदर्शन केले. शहर व जिल्हा काँग्रेस, तसेच आ. डॉ. कल्याण काळे, डॉ. जितेंद्र देहाडे, किरण पाटील डोणगावकर यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या या निर्धार मेळाव्यास चांगला प्रतिसाद मिळाला. नाट्यगृह खच्चून भरले होते. मंचावर विलासरावांची हसतमुख प्रतिमा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. आ. डॉ. कल्याण काळे यांनी प्रास्ताविक केले. त्यात त्यांनी विलासरावांची बारीकसारीक प्रश्न सोडविण्याची हातोटी किती प्रभावी होती, याचे किस्से सांगितले. काळी- पिवळी गाडीच्या नऊ अधिक एक जागेचा प्रश्न विलासरावांनी कसा सोडवला होता, याची माहिती डॉ. काळे यांनी यावेळी दिली. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष केशवराव औताडे, आ.अब्दुल सत्तार, आ. एम. एम. शेख, माजी राज्यमंत्री अनिल पटेल, माजी खासदार उत्तमसिंह पवार, माजी महापौर मनमोहनसिंग ओबेरॉय, विलास औताडे, प्रकाश मुगदिया यांची या मेळाव्यात भाषणे झाली. मंचावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शारदा जारवाल, माजी राज्यमंत्री अशोक पाटील डोणगावकर, माजी आमदार नामदेव पवार, चंद्रभान पारखे, काकासाहेब कोळगे, अशोक मगर, स्वा. सै. लाला लक्ष्मीनारायण जैस्वाल, जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष विनायकराव बोरसे, अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष मुशाहेद सिद्दीकी, रवींद्र काळे, माजी शहराध्यक्ष जीएसए अन्सारी, जि. प. समाजकल्याण समितीचे सभापती रामनाथ चोरमले, औरंगाबाद पं. स. सभापती सरला वाघ, मानसिंग पवार, भाऊसाहेब जगताप, प्रभाकर मुठ्ठे पाटील आदींची उपस्थिती होती. भाषणाच्या वेळी सभागृहातून सतत ‘जय हो’, कार्यकर्त्यांना कुणी विचारतच नाही’ अशी उत्स्फूर्त वाक्ये ऐकावयास मिळाली. मार्ग सापडेल माजी राज्यमंत्री अनिल पटेल म्हणाले, विलासरावांनी पराभवातून यश मिळवलं होतं. आता लोकसभा निवडणुकांमधील पराभवानंतर आपल्याला विलासरावांच्या शैलीतूनच मार्ग सापडेल. तर गोपीनाथ मुंडे यांना काँग्रेस कशी मानवणार नाही, हे त्यावेळी विलासरावांनी सांगून ठेवले होते, याकडे उत्तमसिंह पवार यांनी लक्ष वेधले. आ. अब्दुल सत्तार यांनी आता सरकारी यंत्रणेवर नियंत्रण मिळवून कामे करण्याची अत्यंत गरज असल्याचे सांगितले. पुन्हा काँग्रेसच्याच ताब्यात राहील महाराष्ट्र पुन्हा काँग्रेसच्याच ताब्यात राहील हा निर्धार करू या आणि औरंगाबादचा हा निर्धार संपूर्ण राज्यात पोहोचवू या, असे आवाहन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष केशवराव औताडे यांनी केले. केलेल्या कामांचे जोरदार मार्केटिंग करण्याची गरज आहे, असा निर्धार मेळाव्यात व्यक्त करण्यात आला. विलासराव देशमुख यांच्यावर तयार करण्यात आलेली चित्रफीत या मेळाव्यात दाखवावयाची होती; पण भाषणांमध्ये ही चित्रफीत दाखवायचे राहून गेले. भाऊसाहेब काळे यांनी सूत्रसंचालन केले, तर शहराध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम यांनी आभार मानले. हभप श्रीमती व्यवहारे यांनी गायलेल्या पसायदानानंतर कार्यक्रम संपला. विलासराव प्रेरणा स्थान : थोरात विलासराव देशमुख हे प्रेरणा स्थान होते. त्यांनी कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम केले. शिवाय महाराष्टÑाच्या विकासातही पाऊल टाकले. ते एक स्फूर्ती देणारे व्यक्तिमत्त्व होते, चैतन्यमय व्यक्तिमत्त्व होते. कार्यकर्त्यांच्या मनात ताकद निर्माण करण्याची किमया विलासरावांकडे होती. त्यांच्या स्मृती जागवत कार्यकर्त्यांनी संघर्षाला सामोरे जावे, असे आवाहन यावेळी पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. जिल्ह्यात मागील काळात चांगली कामगिरी बजावली. अनेक पंचायत समित्या ताब्यात घेतल्या. जिल्हा परिषद शिवसेनेच्या ताब्यातून हिसकावली. औरंगाबाद आणि जालना लोकसभा मतदारसंघात काँग्रेस निवडून येण्यासारखी परिस्थिती होती. मात्र, देशाच्या एकूणच वातावरणाचा इथेही परिणाम झाला. परंतु आता या पराभवाने खचून जाऊ नका. विधानसभेत महाराष्टÑ भक्कमपणे काँग्रेसच्या मागे आहे, हे दाखवून द्या. जगात कुठेही नाहीत, अशा योजना यूपीए सरकारने राबविल्या; पण त्या लोकांना समजावून सांगण्यात आपण कमी पडलो. आता केवळ निवडणुका जवळ आल्या म्हणजेच काम करण्याचे दिवस राहिलेले नाहीत. तर पाच वर्षे सातत्याने काम करावे लागणार आहे. ‘एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता’ या मेळाव्यात राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी आपल्या भाषणाची सुरुवात एक शेर सादर करून केली व त्यातून त्यांनी सर्वांना अंतर्मुख केले. ‘एक हारसे कोई फकीर नही बनता और जीत से कोई सिकंदर नही बनता’ असा हा शेर सर्वांच्या मनात घर करून गेला. कर्तृत्व, वक्तृत्व, दूरदृष्टी या बळावर विलासराव देशमुख हे कसे यशस्वी होत गेले याच्या आठवणीत राजेंद्र दर्डा हे हरवून गेले. सिडकोतील भव्य नाट्यगृह आणि मुंबईनंतरचे औरंगाबादेतील कॅन्सर हॉस्पिटल हे विलासरावांच्या दूरदूष्टीचे उत्तम उदहारण होत. आमदार म्हणून अनेक मागण्या करीत असताना विलासराव योग्य मागण्या मान्य करीत. त्यासाठी लागणारा थोडा थोडका नव्हे तर भरीव निधी उपलब्ध करून देत. त्यातूनच औरंगाबादसारख्या ठिकाणी मोठमोठी कामे झाली, याकडे राजेंद्र दर्डा यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. ते म्हणाले, सरकारने खूप कामे केलेली आहेत. परंतु ती जनतेपर्यंत पोहोचविण्यात आपण कमी पडलो. आता नवीन चमू, तरुण हाताशी घेऊन काँग्रेस पक्ष बांधला गेला पाहिजे. नव्या निर्धाराने कामाला लागले पाहिजे. तरुणांना जवळ आणण्याचे काम करायला पाहिजे.