कर्जमाफी नको, शेतकऱ्यांना सक्षम करा
By Admin | Updated: May 23, 2016 23:57 IST2016-05-23T23:53:10+5:302016-05-23T23:57:21+5:30
उस्मानाबाद : कर्जमाफीवर आपला विश्वास नाही़ कारण मागील वेळी कर्जमाफी देण्यात आली होती़ सहा महिन्यांनी पुन्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू झाल्या होत्या़

कर्जमाफी नको, शेतकऱ्यांना सक्षम करा
महादेव जानकर : आरक्षणासाठी सरकार सकारात्मक
उस्मानाबाद : कर्जमाफीवर आपला विश्वास नाही़ कारण मागील वेळी कर्जमाफी देण्यात आली होती़ सहा महिन्यांनी पुन्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू झाल्या होत्या़ आता शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याऐवजी त्यांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे़ यासाठी शेतकऱ्यांना मोफत बी-बियाणे, खते, औषधे, ठिबक आणि वीजपुरवठा केला तर शेतकरी खऱ्या अर्थाने सक्षम होईल आणि आत्महत्या थांबतील असा विश्वास रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी व्यक्त केला़
उस्मानाबाद येथे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत पुढे बोलताना जानकर म्हणाले, आपण इस्राईल देशाचा दौरा करून तेथील जलसंधारण आणि वीजपुरवठ्याची माहिती घेतली आहे़ आता राज्यात फिरून मोठ्या-मध्यम प्रकल्पांची पाहणी करून शासनाला अहवाल देणार आहोत़ कालव्यांमधून प्रकल्पाचे पाणी सोडले तर बाष्पीभवणातून व इतर कारणांनी पाण्याचा अपव्यय होतो़ त्यामुळे शेतकऱ्यांना थेट पाईपलाईनद्वारे पाणी देणे गरजेचे असून, शेतकऱ्यांनी ठिबकचा वापर करून शेती करणे आवश्यक आहे़ शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कर्जमाफी ऐवजी त्यांना मोफत बी-बियाणे, खते, औषधे, वीजेचा पुरवठा करणे गरजेचे आहे़ शिवाय शेतकरी आत्महत्येच्या प्रस्तावाबाबत असलेले निकष बदलणे गरजेचे असून, जिल्ह्यातील नामंजूर झालेले ७६ प्रस्ताव मंजूर व्हावेत, मयत शेतकऱ्यांच्या वारसांना मदत मिळावी, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहोत़ शिवाय राज्यात सर्वत्र हा निकष लागू व्हावा, यासाठीही प्रयत्न करण्यात येणार आहेत़ वेळोवेळी आरक्षणाचा प्रस्ताव दाखल झाल्यानंतर कोणी ना कोणी न्यायालयात गेल्याने तो प्रस्ताव बारगळला आहे़ हे शासन आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक आरक्षण मिळावे यासाठी संस्थेमार्फत सर्वेक्षण सुरू आहे़ या सर्वेक्षणाचा अहवाल आपण राज्य-केंद्राकडे सादर करणार असून, कोणीही या अहवालाला आव्हान दिले तर तो अहवाल टिकेल, असाच बनविण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले़ यावेळी बाळासाहेब पाटील-हाडोंग्रीकर, आश्रुबा कोळेकर, शिवाजी कोळेकर, आण्णा बंडगर आदीची उपस्थिती होती़ दरम्यान, महादेव जानकर यांनी तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे जावून श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले़
पालिका, जिल्हा परिषद स्वबळावर
मित्रपक्षांनी मंत्रीपदाचे आश्वासन दिले होते़ त्यामुळे मी मंत्रीपद मागणे उचित नाही़ मात्र, त्यांनी दिलेला शब्द पाळणे गरजेचे आहे़ दिलेला शब्द पाळला नाही तर पुढील निवडणुकांमध्ये त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील़ शिवाय आगामी नगर पालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका रासपा स्वबळावर लढणार असल्याचेही जानकर यांनी यावेळी सांगितले़