अहवालासाठी वेळ मिळेना !
By Admin | Updated: June 19, 2014 00:18 IST2014-06-19T00:00:02+5:302014-06-19T00:18:10+5:30
लातूर : कुटुंब नियोजनाच्या बिनटाक्याच्या शस्त्रक्रियेमुळे महिलेचा बळी जाऊन जवळपास तीन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला असला तरी अद्यापही शवविच्छेदनाचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला नाही़

अहवालासाठी वेळ मिळेना !
लातूर : कुटुंब नियोजनाच्या बिनटाक्याच्या शस्त्रक्रियेमुळे महिलेचा बळी जाऊन जवळपास तीन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला असला तरी अद्यापही शवविच्छेदनाचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला नाही़ लातुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातून हा अहवाल आणण्यासाठी जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य विभागास वेळच मिळत नसल्याने या घटनेस जबाबदार वैद्यकीय अधिकाऱ्यावर कुठलीही कार्यवाही होऊ शकली नाही़
उदगीर येथे सालगडी म्हणून काम करीत असलेले मालू टाळीकुटे यांची पत्नी ललिताबाई टाळीकुटे यांच्यावर कुटुंबनियोजनाची बिनटाक्याची शस्त्रक्रिया करण्याचा प्रयत्न उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आला होता़ या शस्त्रक्रियेसाठीचे साहित्य तिच्या पोटात गेले नाही़ दरम्यान, काही तासानंतर तिचे पोट फुगुन अंगात ताप भरला़ त्यामुळे उपचारासाठी तिला लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले़
लातुरात तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली़ परंतु, त्यानंतर ती दगावली़ हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे पाहून लोकमतमधून सविस्तर वारंवार वृत्त प्रकाशित करण्यात आले़ त्यामुळे अखेर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने पाच सदस्यीय समितीची स्थापना केली़ या समितीने उदगीरमध्ये सदरील महिलेवर शस्त्रक्रिया करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याची चौकशी करुन तिचा अहवाल जिल्हा आरोग्य विभागाकडे सादर केला़ परंतु, हा लिखित अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ सुधाकर शेळके यांच्याकडे पोहोचण्यासाठी दोन दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागला़ या अहवालात महिलेचा मृत्यू जंतूसंसर्गामुळे झाला असल्याचे सांगण्यात येत असले तरी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून अद्यापही दुजोरा मिळू शकला नाही़
ही घटना घडून जवळपास तीन आठवड्यांचा कालावधी उलटला असली तरी अद्यापही जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना सदरील महिलेच्या शवविच्छादनाचा अहवाल प्राप्त झाला नाही़ विशेष म्हणजे गेल्या आठवडाभरापासून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना हा अहवाल लातुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातून आणण्यास वेळच मिळत नसल्याचे पहावयास मिळत आहे़
वैद्यकीय अहवाल उपलब्ध नसल्याने या घटनेस जबाबदार असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यावर कुठलीही कारवाई होऊ शकली नाही़ वास्तविक पाहता जिल्हा आरोग्य विभागाकडूनच हे प्रकरण दाबण्यासाठी चालढकल करण्यात येत आहे की काय? असा सवाल होत आहे़ (प्रतिनिधी)
पुन्हा तेच बोल...
वास्तविक पाहता गत आठवड्यातच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे चौकशी करुन हा अहवाल मिळविणार असल्याचे सांगितले होते़परंतु, आठवडाभराचा कालावधी उलटला असला तरी अहवाल आणण्यासाठी कर्मचाऱ्यास कुठलीही सूचना केली नाही़ त्यामुळे डॉक्टरास अभय देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे की काय? असा सवाल होत आहे़
आम्ही पोलिसांकडे चौकशी केली़ परंतु, वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला नसल्याचे त्यांनी सांगितले़ त्यामुळे आता आम्ही लातुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाकडे चौकशी करुन तो प्राप्त करुन घेणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ सुधाकर शेळके यांनी सांगितले़