धीर सोडू नका... अनुदानाचा लाभ घ्या !
By Admin | Updated: April 17, 2015 00:43 IST2015-04-17T00:17:21+5:302015-04-17T00:43:35+5:30
बीड : गतआठवड्यात बरसलेल्या अवकाळीच्या तडाख्याने फळबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अगोदरही पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून

धीर सोडू नका... अनुदानाचा लाभ घ्या !
बीड : गतआठवड्यात बरसलेल्या अवकाळीच्या तडाख्याने फळबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अगोदरही पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून आता फळबागांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. त्यामुळे बळीराजाने अनुदान पदरात पाडून घेणे महत्त्वाचे असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक आर.एस. भताने यांनी लोकमत शी बोलताना सांगितले.
नुकसानीची तीव्रता लक्षात घेता नुकसान क्षेत्राच्या अनुमानामध्ये बदल करण्यात आला असून दर हेक्टरीच्या रकमेतही वाढ करण्यात आली आहे. यापुर्वी ५० टक्के पिकांचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई मिळत होती. यामध्ये बदल करून ३३ टक्के नुकसान झाल्यासही शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे. तर दर हेक्टरी ४५०० रुपये मिळणाऱ्या रकमेत बदल करण्यात आला असून आता ६८०० रुपये शेतकऱ्यांच्या पदरात पडणार आहेत. नुकसानीची तीव्रता अधिक असल्याने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जात आहे. त्या अनुषंगाने पंचनाम्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून गुरूवारपर्यंत १७०० हेक्टर बागांच्या नुकसानीचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे. अवकाळी हा शेतकऱ्यांच्या जीवावर बेतला असून याचा सामना करण्यासाठी उर्वरित फळबागांची काळजी घेणे आवश्यक आहे. खरीप हंगाम सुरू होण्यास तीन महिन्याचा अवकाश आहे. कमी कालावधीमध्ये शेतकऱ्यांना इतर पिके घेणे शक्य नाही. त्यामुळे उर्वरीत काळात शेतीची योग्य प्रकारे मशागत करून संकटामुळे कोलमोडून न जाता पुन्हा जोमाने कामला सुरवात करणे महत्वाचे आहे. याकरिता उताराला आडवी नांगरणीतून मशागत करून जलसंधारणेचे काम करावे असे आवाहनही जिल्हा कृषि अधीक्षक रमेश भताने यांनी केले आहे. (प्रतिनिधी)