समाज बांधणाऱ्या महापुरुषांच्या नावाने तेढ नको
By Admin | Updated: April 9, 2015 00:13 IST2015-04-08T23:59:15+5:302015-04-09T00:13:25+5:30
लातूर : महापुरुषांना कोणत्याही जातीत बांधण्याचा प्रयत्न करु नये. ते एका जातीचे नाहीत. अनुयायांनी महापुरुषांच्या विचारांचे अनुकरण करुन समाज समृध्द करावा

समाज बांधणाऱ्या महापुरुषांच्या नावाने तेढ नको
लातूर : महापुरुषांना कोणत्याही जातीत बांधण्याचा प्रयत्न करु नये. ते एका जातीचे नाहीत. अनुयायांनी महापुरुषांच्या विचारांचे अनुकरण करुन समाज समृध्द करावा. त्यांच्या नावावर समाजात तेढ होईल, असे वर्तन करु नये, असे आवाहन जिल्हा दक्षता समितीच्या वतीने ‘धार्मिक व जातीय सलोखा राखण्यासाठी समाजाचे योगदान’ या विषयावरील परिसंवादात मान्यवरांनी केले.
येथील दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या या कार्यक्रमात अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष न्या. सी. एल. थूल, ज्येष्ठ विचारवंत डॉ. जनार्दन वाघमारे, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, पोलिस अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, महापौर अख्तर शेख, अतुल देऊळगावकर, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक चिंचोेले, मौलाना इस्माईल काझी, मौलाना अलि साहाब, समाजकल्याणचे आयुक्त संजय दाणे, प्रादेशिक समाजकल्याण विभागाचे माधव वैद्य आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करुन परिसंवादाला प्रारंभ झाला. यावेळी बोलताना डॉ. जनार्दन वाघमारे म्हणाले, महापुरुष हे काही कोण्या एका जातीची मक्तेदारी नाही. पण अलिकडच्या काळात प्रत्येक जातींनी आपापल्या जातीतील महापुरुषांना जातीपुरते बांधून ठेवले आहे. यामुळे लोकही आपापल्या जातीपुरते संकुचित बनत आहेत. रोवलेला खुंटा जमीनीतून काढण्यासाठी हलवावा आणि तो पुन्हा घट्ट व्हावा अशी अवस्था जात आणि धर्माची झाली आहे. उत्सवात प्रदूषण होतेच पण समाजिक प्रदूषण जास्त चिंताजनक आहे. ते रोखण्यासाठी प्रत्येकांनी उत्सवाताला मंगल स्वरुप दिले पाहीजे, अशा अपेक्षाही त्यांनी व्यक्त केल्या. यावेळी मार्गदर्शन करताना अनुसूचित जाती जमातीचे आयोगाचे अध्यक्ष न्या. सी. एल. थूल यांनी समाजात धार्मिक आणि जातीय सलोखा असणे ही निरोगी समाजाची बाब असल्याचे सांगितले. जाती आणि धर्म या बाबी पूर्णपणे वैयक्तिक आहेत. परंतु या माध्यमातून समाजात दुही पसरवली जात असल्याबद्दल खंत व्यक्त केली. यावेळी महापौर अख्तर शेख, अतुल देऊळगावकर, अशोक चिंचोले, मौलाना इस्माईल कास्मी यांनीही आपले मनोगत वक्त केले.