जिल्हा परिषद मल्टीपर्पज हायस्कूलला गतवैभव प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 00:19 IST2017-09-05T00:19:32+5:302017-09-05T00:19:32+5:30
वजिराबाद परिसरातील मागील अनेक वर्षांपासून अखेरच्या घटिका मोजणाºया जिल्हा परिषद मल्टीपर्पज हायस्कूलचा पुनर्जन्म झाल्याने ही शाळा पुन्हा एकदा गतवैभवाची साक्ष देत दिमाखात उभी राहिली आहे़ ही किमया शाळेचे मुख्याध्यापक बालासाहेब कच्छवे यांच्या अथक प्रयत्नातून साधली़

जिल्हा परिषद मल्टीपर्पज हायस्कूलला गतवैभव प्राप्त
भारत दाढेल ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : वजिराबाद परिसरातील मागील अनेक वर्षांपासून अखेरच्या घटिका मोजणाºया जिल्हा परिषद मल्टीपर्पज हायस्कूलचा पुनर्जन्म झाल्याने ही शाळा पुन्हा एकदा गतवैभवाची साक्ष देत दिमाखात उभी राहिली आहे़ ही किमया शाळेचे मुख्याध्यापक बालासाहेब कच्छवे यांच्या अथक प्रयत्नातून साधली़
निजामकालीन ही शाळा त्यावेळी मराठवाड्यात दुसºया क्रमांकाची होती़ शाळेचे बांधकाम १९०२ ते १९१० या काळात झाले आहे. माजी शिक्षण राज्यमंत्री कमलकिशोर कदम, माजी आमदार, स्वातंत्र्य सैनिक साहेबराव देशमुख बारडकर हे या शाळेचे विद्यार्थी. मध्यंतरी शाळेच्या वैभवाची घसरण सुरू झाली़ खासगी शाळा नावारूपाला आल्या, परंतु ही शाळा उपेक्षित राहिली. अलीकडे तर ही ऐतिहासिक वास्तू धर्मशाळा बनली होती़ शाळेला संरक्षक भिंत नसल्याने मैदानावर अतिक्रमण वाढले़ शाळेच्या परिसरात दारूच्या बाटल्या सापडू लागल्या़ मद्यपींची रात्रीची बैठक या ठिकाणी सुरू झाली होती़ शाळा सुधारण्यासाठी कोणीच पुढाकार घेत नव्हते़ या इमारतीचे वैभव हळूहळू नष्ट होऊ लागले़ त्यामुळे रम्य वाटणारी ही वास्तु भयाण वाटत होती़ शिक्षक बालासाहेब कच्छवे यांना पदोन्नती मिळून ते शाळेचे मुख्याध्यापक झाले. याच काळात अभिमन्यू काळे जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर आले. काळे यांनी शाळेला भेट दिली. त्यावेळी मुख्याध्यापक कच्छवे यांनी शाळेच्या दयनीय अवस्थेबद्दल सांगितले. काळे यांनी मदतीचा हात दिला आणि कामाला सुरुवात झाली़ २ आॅक्टोबर २०१६ ते १२ जानेवारी २०१७ या शंभर दिवसांत हा कायाकल्प प्रकल्प सिद्धीस गेला.
जुनी ऐतिहासिक वास्तू जतन कशी करायची, यासाठी सुरेश जोंधळे यांचा सल्ला मिळाला. कमी वेळात जास्त काम करण्यासाठी जपानी कायझेन तंत्र वापरले. इमारतीचा रंग उडालेला. सागवानी दरवाजे, खिडक्या, कपाटे, फर्निचर सगळं जुनाट. त्यांना पॉलिश करायचे ठरले़ कारागिरांच्या राहण्याची व्यवस्था कामावरच करण्यात आली़ त्यामुळे त्यांनी ३९ दिवसांत काम पूर्ण केले़
शाळेची संरक्षक भिंत बांधून घेतली. साचलेल्या दारूच्या बाटल्यांच्या काचा भिंतीवर लावल्या. त्यामुळे शाळा सुरक्षित झाली. बाग कामामुळे वास्तूला शोभा आली़ सीसीटीव्ही कॅमेºयामुळे प्रत्येक वर्गात काय चालू आहे हे मुख्याध्यापक कार्यालयात बसून बघू- ऐकू लागले़ निजामकाळापासून इथे हवामानाच्या नोंदी घेणारी यंत्रणा आहे. जलमापिका, आर्द्रतामापिका, वायूवेगमापिका, वायूदाबमापक, दिशादर्शक कुकुट यंत्र यावर रोज नोंदी होतात.
नवे रूप परिधान करून शाळेची वास्तू आज दिमाखात उभी आहे़