जि. प. दस्तावेजांचे ‘डिजिटलायझेशन’ लवकरच
By Admin | Updated: August 11, 2015 00:54 IST2015-08-11T00:42:24+5:302015-08-11T00:54:19+5:30
औरंगाबाद : प्रत्येक फायलींचा निपटारा झाल्यानंतर त्याचे व्यवस्थित जतनही झाले पाहिजे; पण जि. प. आणि पंचायत समितीस्तरावर पाहिजे

जि. प. दस्तावेजांचे ‘डिजिटलायझेशन’ लवकरच
औरंगाबाद : प्रत्येक फायलींचा निपटारा झाल्यानंतर त्याचे व्यवस्थित जतनही झाले पाहिजे; पण जि. प. आणि पंचायत समितीस्तरावर पाहिजे तशी प्रशासकीय शिस्त पाळली जात नाही. या पार्श्वभूमीवर दस्तावेजांचे दीर्घकाळ जतन व्हावे, या उद्देशाने सर्व दस्तावेजांचे ‘डिजिटलायझेशन’ करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार असल्याची माहिती जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.
यासंदर्भात ते म्हणाले की, १६ ते २१ आॅगस्टदरम्यान जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. यामध्ये दैनंदिन कामकाज पूर्ण झालेल्या फायली ६ गठ्ठे पद्धतीने ठेवणे, पूर्ण झालेल्या कामांच्या फायली रेकॉर्डरूममध्ये नियोजित जागेवर व्यवस्थित ठेवणे, संचिकांवर अनावश्यक टिपण्या न लिहिणे आदींचा समावेश असेल. तत्पूर्वी, १२ व १३ आॅगस्ट रोजी ४ सत्रांमध्ये कर्मचाऱ्यांना यासंबंधीचे प्रशिक्षण दिले जाईल. जि. प., पं. स. च्या सर्व कर्मचाऱ्यांना हे प्रशिक्षण सक्तीचे राहणार आहे. प्रशिक्षण घेतल्यानंतर कर्मचारी आपापल्या कार्यालयातील दस्तावेज व्यवस्थित ठेवणे व त्याच्या जतनाबाबत काळजी घेतील.
२१ आॅगस्टनंतर केव्हाही मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चौधरी हे जि. प. मुख्यालयातील विभागांना भेटी देऊन तेथील दस्तावेज व्यवस्थापनाबाबत क्रॉस चेकिंग करणार आहेत. पंचायत समितीस्तरावर विभागप्रमुखांना पाठवून आढावा घेतला जाणार आहे.
शिक्षणसेवक म्हणून रुजू झाल्यानंतर शिक्षण विभागाने खातरजमा करण्यासाठी संबंधितांची मूळ कागदपत्रे हस्तगत केली होती. हे शिक्षणसेवक नंतर पूर्णवेळ शिक्षक झाल्यानंतर त्यांनी आपली मूळ कागदपत्रे परत मागितली, तेव्हा अनेकांची कागदपत्रे सापडत नाहीत.