धान्य पुरवठ्यात विस्कळीतपणा
By Admin | Updated: September 3, 2015 00:19 IST2015-09-03T00:19:24+5:302015-09-03T00:19:24+5:30
उमरगा : उमरगा व तालुक्यातील मुरूम येथील गोडाऊनमधून रास्तभाव दुकानदारांना वेळेवर धान्याचा पुरवठा होत नाही़ परिणामी उमरगा विभागातील ९७ गावातील

धान्य पुरवठ्यात विस्कळीतपणा
उमरगा : उमरगा व तालुक्यातील मुरूम येथील गोडाऊनमधून रास्तभाव दुकानदारांना वेळेवर धान्याचा पुरवठा होत नाही़ परिणामी उमरगा विभागातील ९७ गावातील १५१ दुकानांतर्गतच्या ६७ हजार ५१६ कार्डधारकांना याचा फटका सहन करावा लागत आहे़
पुरवठा विभागाकडून प्राधान्य कुटुंब केसरी, शुभ्र, प्राधान्य कुटुंब बी.पी.एल. प्राधान्य कुटुंब अंत्योदय आदी शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना शासनाकडून गहू, तांदूळ, साखर आदी धान्य स्वस्त भावाने दिले जाते. उमरगा विभागातील ९७ गावांसाठी १५१ रास्तभाव दुकाने आहेत़ तर तालुक्यात २७५२ शुभ्र, १० हजार ६८१ केशरी, १७ हजार ४५३ प्राधान्य कुटुंब केसरी शिधापत्रिकाधारक, १४ हजार २१५ प्राधान्य कुटुंब बी.पी.एल. शिधापत्रिका धारक आहेत़ उमरगा येथील गोडाऊनमधून १०२ दुकानांना धान्याचा पुरवठा होतो़ या दुकानांतर्गत ७१ गावातील कार्डधारकांना धान्याचा पुरवठा होतो़ तर मुरूम गोडाऊनमधून ४९ दुकानदारांना धान्याचा पुरवठा होत असून, याचा लाभ २६ गावातील कार्डधारकांना होत आहे़ यात तालुक्यातील तलमोड, दगडधानोरा, मानेगोपाळ, जगदाळवाडी, नारंगवाडी, मातोळा, कवठा, दाळींब, केसरजवळगा, वागदरी, व्हंताळ, बलसूर, जकेकूर, येळी, जकेकूरवाडी, औराद, कदेर, मुरळी, कंटेकूर आदी गावे मुरूम व उमरगा शहरापासून खूपच दूर आहेत़ त्यामुळे मालाच्या वाहतुकीत मोठा विलंब होताना दिसत आहे़ तर अनेक वेळा गोडाऊनमध्येच मागणीनुसार धान्य उपलब्ध नसल्याने गावात धान्याचा पुरवठा उशिराने होत आहे़ गोडाऊनमधून दुकानदारांना उशिराने धान्याचा पुरवठा होत असल्याने याचा थेट फटका तालुक्यातील कार्डधारकांना सहन करावा लागत आहे़ (वार्ताहर)
कदेर, व्हंताळ, भगतवाडी, चिरेवाडी, सावळसूर, धाकटीवाडी, एकोंडीवाडी, अंबरनगर, तुगाव, कंटेकूर या गावातील लाभार्थींना महिला बचतगटामार्फत रास्त भावाने धान्याचा पुरवठा करण्यात येतो.
प्राधान्य कुटूंब अंत्योदय मधील ६ हजार ८७१ शिधापत्रिकाधारकांना १ हजार ३७४ क्विंटल गहू तर ६८७ क्विंटल तांदळाचे प्रतिमाह वाटप होते़ तर तालुक्यातील ६७ हजार ५१६ कार्डधारक असून, या अंतर्गत ३ लाख २६ हजार २६५ लाभार्थ्यांना प्रतिमहा ६० हजार २६ क्विंटल गव्हाचे तर ३ हजार ७८८ क्विंटल तांदळाचे वाटप करण्यात येते़याशिवाय इतर शिधापत्रिकांनाही नियमानुसार धान्याचे वाटप करण्यात येते़
शासनाकडून दुकानदारांना प्रतिक्विंटल ७० रुपये कमिशन दिले़ तसेच प्रतिक्विंटल साडेनऊ रुपये रिपीट मार्जीन दिले जाते. तर प्रवास खर्च व कमिशन तुटपुंजे असून, तोटा सहन करावा लागत असल्याचे रास्तभाव दुकानदारांचे म्हणणे आहे़ शासनाने कमिशनमध्ये वाढ करावी, अशी मागणी के. व्ही. क्षीरसागर, सुधाकर गायकवाड, व्हंताळ येथील बचतगटाच्या सुनीता ममाळे यांनी केली़