रिक्षा बंदमुळे गैरसोय

By Admin | Updated: December 23, 2014 00:58 IST2014-12-23T00:43:14+5:302014-12-23T00:58:42+5:30

औरंगाबाद : प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांच्या कारवाईच्या निषेधार्थ तसेच विविध मागण्यांसाठी सोमवारी काही रिक्षा संघटनांनी बंद पाळला.

Disadvantage of rickshaw shutdown | रिक्षा बंदमुळे गैरसोय

रिक्षा बंदमुळे गैरसोय



औरंगाबाद : प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांच्या कारवाईच्या निषेधार्थ तसेच विविध मागण्यांसाठी सोमवारी काही रिक्षा संघटनांनी बंद पाळला. यामध्ये जालना रोड, मध्यवर्ती बसस्थानक, सिडको बसस्थानक, रेल्वेस्थानकासह विविध मार्गांवर अवघ्या १० ते १५ रुपयांत वाहतूक करणाऱ्या रिक्षा बंद होत्या. यामुळे प्रवाशांची पायपीट झाली. शिवाय मुलांना शाळेत सोडण्यासाठी पालकांची धावपळ आणि शहर बसला गर्दी दिसून आली.
रिक्षाचालकांच्या बंदमुळे २४ तास वर्दळीचा जालना रोड, रेल्वेस्थानक, मध्यवर्ती बसस्थानकांसह विविध भागांत सकाळपासूनच रिक्षांची तुरळक गर्दी दिसून आली. दररोज प्रवासी दिसताक्षणी रिक्षा थांबविल्या जात असल्याचे चित्र दिसून येते. शहर बसथांब्यांवर रिक्षा, अ‍ॅपेरिक्षांचीच गर्दी असते; परंतु बंदमुळे प्रवासी रस्त्यांवर उभे राहून रिक्षा, अ‍ॅपेरिक्षांची वाट बघत होते. ये-जा करणाऱ्या रिक्षांना प्रवासी हात दाखवून थांबविताना दिसून आले. बंदला १०० टक्के प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, तरीही प्रवाशांना रिक्षांची शोधाशोध करावी लागली. शहरात आलेल्या पाहुण्यांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागला.
रिक्षा बंद ठेवण्यासाठी वाद
बंदची हाक दिल्यानंतरही सोमवारी अनेक मार्गांवर रिक्षातून प्रवासी वाहतूक सुरू होती; परंतु अन्य रिक्षाचालकांनी अशा रिक्षा अडवून रिक्षा बंद करण्यास भाग पाडले, तर प्रवाशांनाही रिक्षातून खाली उतरविण्यासाठी वाद घातला. भडकलगेट, रेल्वेस्थानक, सिडको बसस्थानक, जिल्हाधिकारी कार्यालय इ. ठिकाणी असे प्रकार घडले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका रिक्षाची काच फोडण्याचा प्रकारही झाला.
जादा कमाई
बंदचा फायदा घेत काही रिक्षाचालकांनी चांगलीच कमाई करून घेतली. अनेक मार्गांवर प्रवाशांकडून जादा भाड्याची वसुली करण्यात आली. अनेकांनी एका प्रवाशाकडून ४० ते ५० रुपये वसूल केले.

विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाही बंद राहिल्याने शाळेत ये-जा करण्यासाठी पायपीट करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली. शाळा परिसरात विद्यार्थ्यांचे पालक दुचाकी व अन्य वाहनांनी येताना-जाताना दिसून आले. अनेक पालकांनी शहर बसमधून विद्यार्थ्यांना सोडले.
शहरात जवळपास परवानाधारक २० हजार रिक्षा असून, बंददरम्यान १५ हजार रिक्षा बंद होत्या. बंदला जवळपास ८० टक्के प्रतिसाद मिळाल्याचा दावा रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.४
रिक्षा बंदमुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एस.टी. महामंडळाने जादा बसेस सोडल्या. रोज ३० ते ३५ धावणाऱ्या बसची संख्या ४८ करण्यात आली. अपुऱ्या शहर बसच्या संख्येमुळे ग्रामीण भागातील बसेस वापरण्यात आल्या. जालना रोड, रेल्वेस्थानक, मध्यवर्ती बसस्थानक, सिडको, औरंगपुरा आदी मार्गांवर बसेस सोडण्यात आल्या. तरीही ठिकठिकाणी प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागले. ४
दररोज रिकाम्या धावणाऱ्या शहर बसेस सोमवारी भरून जाताना दिसल्या. दररोज शहर बसचे उत्पन्न जवळपास दीड लाख रुपये होते; परंतु बंदमुळे दुपारपर्यंतच १ लाख ३८ हजार रुपये उत्पन्न मिळाले. सायंकाळपर्यंत हे उत्पन्न दुप्पट झाले.

Web Title: Disadvantage of rickshaw shutdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.