थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवेची सीएमआयएची मागणी
By Admin | Updated: July 5, 2014 01:01 IST2014-07-05T00:48:34+5:302014-07-05T01:01:43+5:30
औरंगाबाद : पर्यटनाची राजधानी, औद्योगिकनगरी औरंगाबादेत विदेशातून ये-जा करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. हे लक्षात घेऊन चिकलठाणा विमानतळावरून थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यात यावी

थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवेची सीएमआयएची मागणी
औरंगाबाद : पर्यटनाची राजधानी, औद्योगिकनगरी औरंगाबादेत विदेशातून ये-जा करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. हे लक्षात घेऊन चिकलठाणा विमानतळावरून थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी चेम्बर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर (सीएमआयए)च्या वतीने जेट एअरवेज कंपनीला करण्यात आली आहे.
जेट एअरवेज कंपनीचे महाव्यवस्थापक (सेल्स) अॅनामॉय मित्रा व जलील अहमद यांनी सीएमआयएच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी उद्योजकांच्या संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन त्यांना देण्यात आले.
यावेळी विमान कंपनीचे अधिकारी व उद्योजकांमध्ये सविस्तर चर्चा झाली. यावेळी संघटनेचे नवीन अध्यक्ष मुनीष शर्मा यांनी सांगितले की, औरंगाबादेतून देशांतर्गत महत्त्वाच्या महानगरात जाण्यासाठी विमानसेवा सुरू करण्यात यावी. विविध देशांत जाण्यासाठी येथून थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यात यावी. याशिवाय येथील औद्योगिक उत्पादने, शेतीमालाच्या आयात- निर्यातीसाठी कार्गो सेवा लवकर सुरू करावी. आंतरराष्ट्रीय विमान प्रवास करणाऱ्यांसाठी विमानतळावर पॅसेंजर लाऊंज तयार करण्यात यावे.
मुंबई- औरंगाबादेतील भाडे कमी करण्यात यावे तसेच औरंगाबादला देशातील महत्त्वाच्या शहरांशी जोडण्यासाठी दिल्ली- हैदराबाद, अहमदाबाद- औरंगाबाद, अशी विमानसेवाही सुरू करण्यात यावी. औरंगाबादकरांच्या या सर्व मागण्यांवर सकारात्मक विचार करण्यात येईल, असे आश्वासन अॅनामॉय मित्रा यांनी यावेळी दिले. सीएमआयएच्या वतीने उपाध्यक्ष आशिष गर्दे, माजी अध्यक्ष मिलिंद कंक, कॅप्टन पीयूष सिन्हा आदी उद्योजकांची यावेळी उपस्थिती होती.
सीएमआयएची कार्यकारिणी जाहीर
चेंबर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर (सीएमआयए) या संघटनेची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून, अध्यक्षपदी मुनीष शर्मा तर सचिवपदी रितेश मिश्रा यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
मराठवाड्यातील उद्योजकांचे नेतृत्व करणारी ही सर्वात मोठी संघटना आहे.
या संघटनेची वर्ष २०१४-१५ साठीची कार्यकारिणी निवडण्यात आली. उर्वरित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : उपाध्यक्ष- आशिष गर्दे, कोषाध्यक्ष- आशिक पोकर्णा, सहसचिव- दुष्यंत पाटील, सहकोषाध्यक्ष- अक्षय राठी यांचा समावेश आहे. याशिवाय एम. पी. शर्मा, नवीन निजहवन, विनय चितळे, जतीन सुभेदार, व्ही. एन. नांदापूरकर, आणि डॉ.अनंत पंढरे हे सदस्य
आहेत.