धारूरात पाणी पेटले
By Admin | Updated: August 5, 2015 00:36 IST2015-08-05T00:13:07+5:302015-08-05T00:36:10+5:30
अनिल महाजन , धारूर दिवसेंदिवस पाणीटंचाई रौद्र रूप धारण करीत असल्याने पाणी जीवन नव्हे संघर्ष बनतोय. याचा प्रत्यय मंगळवारी धारूर तालुक्यात आला.

धारूरात पाणी पेटले
अनिल महाजन , धारूर
दिवसेंदिवस पाणीटंचाई रौद्र रूप धारण करीत असल्याने पाणी जीवन नव्हे संघर्ष बनतोय. याचा प्रत्यय मंगळवारी धारूर तालुक्यात आला.
तालुक्यातील मोरफळी साठवण तलावातून आठ टँकरने आजूबाजूच्या गावांना पाणीपुरवठा केला जात होता. आता अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिल्याने मोरफळी साठवण तलावाजवळील आसरडोह येथील ग्रामस्थांनी हे पाणी भविष्यात आम्हाला लागेल, असा मुद्दा पुढे करीत होत असलेल्या आठ गावांचा पाणीपुरवठा दोन दिवसांपासून थांबवला आहे. मोरफळी साठवण तलावाजवळ सध्या आठ टँकर पाण्याच्या मागणीसाठी उभे ओहत.
मोरफळी तलावावर पाण्यासाठी सुरू असलेला संघर्ष आता शिगेला पोहचण्याची शक्यता आहे. आसरडोह येथील ग्रामस्थांच्या मतांनुसार येथील पाणीसाठा आरक्षित आहे. भविष्यात आसरडोह गावाकरिता आरक्षित ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. यामुळे हे पाणी आम्ही इतर गावांना टँकरद्वारे नेऊ देणार नाही, अशी भूमिका आसरडोह येथील ग्रामस्थांनी घेतली आहे. टँकर चालक व आसरडोह येथील ग्रामस्थ यांच्यातील संघर्षाची प्रशासनाला कालपर्यंत कसलीच खबरदारी नव्हती. माहिती झाल्यानंतर गटविकास अधिकारी यांनी तलावाला भेट दिली. यामुळे प्रकरण निवळले आहे.
या ठिकाणी होत होता पाणीपुरवठा
येथील साठवण तलावावरून आठ टँकरद्वारे आसोला आईचा तांडा, चांभारतळ तांडा, अंजनडोह, उमरेवाडी, कोळपिंप्री, खोडस, वाघोली, चिंचपूर या गावांना पाणी पुरवठा केला जातो. तूर्तास तरी संबंधित गावांना पाणीपुरवठा सुरू आहे.
गटविकास अधिकारी कांबळे यांनी मोरफळी साठवण तलावावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली व आसरडोह येथील ग्रामस्थांना भेटून त्यांची समजूत घातल्याने तूर्तास तरी हा प्रश्न मिटला असून, सध्या टँकर पूर्ववत झाले आहेत.
४धारूर तालुक्याप्रमाणेच इतर तालुक्यांमध्येही भविष्यात पाणी प्रश्न पेटू शकतो, अशी परिस्थिती निर्माण झाला आहे. याचा बंदोबस्त करण्यासाठी प्रशासनाला विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांनी सांगितले.