पाणी बचतीचा निर्धार
By Admin | Updated: May 8, 2016 01:06 IST2016-05-08T00:57:36+5:302016-05-08T01:06:02+5:30
औरंगाबाद : महाराष्ट्र आणि देशातील बहुतांश भागांमध्ये जलसंकट ओढावले आहे. या बिकट परिस्थितीत पाण्याची बचत आणि त्याच्या पुनर्वापरासाठी ‘लोकमत’ने राज्यभर जलमित्र अभियान हाती घेतले आहे.

पाणी बचतीचा निर्धार
औरंगाबाद : महाराष्ट्र आणि देशातील बहुतांश भागांमध्ये जलसंकट ओढावले आहे. या बिकट परिस्थितीत पाण्याची बचत आणि त्याच्या पुनर्वापरासाठी ‘लोकमत’ने राज्यभर जलमित्र अभियान हाती घेतले आहे. या अभियानात शहरातील व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, डॉक्टर्स, प्लंबिंग असोसिएशन यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याची तयारी दर्शवून पाणी बचतीचा निर्धार केला.
सध्याच्या जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर पाणी बचतीसाठी जनजागरण व्हावे, या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या अभियानानिमित्त शनिवारी ‘लोकमत भवन’ मध्ये बैठक घेण्यात आली. यावेळी औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अजय शहा, उपाध्यक्ष हरिसिंग, कोषाध्यक्ष शिवशंकर स्वामी, औरंगाबाद हॉटेल, रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी पाटील, अविनाश अवरगावकर, प्लंबिंग असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष श्रीरंग फरकाडे, अध्यक्ष ज्ञानेश्वर खरात, सचिव बाळासाहेब भोसले, कोषाध्यक्ष वजीद सिराज, कार्याध्यक्ष चंद्रशेखर कुबेर, संतोष कुमावत, बबन खरात, लायन्स क्लब आॅफ औरंगाबादचे बोर्ड आॅफ डायरेक्टर अब्दुल हकीम, इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. अनुपम टाकळकर, ‘लोकमत’चे संपादक सुधीर महाजन, ‘लोकमत समाचार’चे कार्यकारी संपादक अमिताभ श्रीवास्तव, ‘लोकमत टाइम्स’चे निवासी संपादक योगेश गोले, ‘लोकमत’चे सहायक उपाध्यक्ष संदीप विष्णोई यांची उपस्थिती होती.
औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे अजय शहा म्हणाले, पाणीटंचाईच्या परिस्थितीमुळे आज जलमित्र बनविणे ही खरी गरज आहे. शहरासह ग्रामीण भागात वॉटर हार्वेस्टिंग करण्याची गरज आहे. त्यासाठी व्यापारी महासंघ पुढाकार घेत असल्याचे सांगितले.
डॉ. अनुपम टाकळकर म्हणाले, रेन वॉटर हार्वेस्टिंग ही काळाची गरज आहे. त्यामुळे अभियानात इंडियन मेडिकल असोसिएशन प्राधान्याने सहभागी होईल, असे त्यांनी सांगितले. श्रीरंग फरकाडे म्हणाले, शहरातील रस्त्यावरील, उतारावरील पाणी वाहून जाते. वाहून जाणारे पाणी मोकळ्या जागांच्या माध्यमातून जमिनीत मुरविले पाहिजे, असे ते म्हणाले. हॉटेल असोसिएशनही ‘लोकमत’च्या जलमित्र अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी होणार आहे. उपस्थित मान्यवरांनी उत्साहाने अभियानात सहभागी होणार असल्याचे सांगून ‘लोकमत’चा हा उपक्रम कौतुकास्पद आणि स्वागतार्ह असल्याचे सांगितले.
औरंगाबाद हॉटेल, रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी पाटील म्हणाले, हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना ग्लास भरून पाणी दिले जाते. त्यातून अनेकदा पाणी वाया जाते. त्यामुळे अर्धा ग्लास पाणी देण्यास प्राधान्य दिले पाहिजे, याची सुरुवातदेखील करण्यात आली आहे. हॉटेल असोसिएशन या अभियानात सहभागी होणार आहे.
प्रारंभी ‘लोकमत’चे संपादक सुधीर महाजन यांनी जलमित्र अभियानाविषयी माहिती दिली. पैसे खर्च करताना ज्याप्रमाणे काळजी घेतली जाते, त्याचप्रमाणे पाण्याचीही बचत करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. यावेळी विविध टप्प्यांमध्ये होणाऱ्या या अभियानात सोशल मीडियातून जनजागृती, पोस्टर्स स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, जलमित्रांकडून जनजागृती आदींविषयी त्यांनी माहिती दिली.