सारोळ्यातील दोन दारुअड्डे उद्ध्वस्त
By Admin | Updated: September 4, 2015 00:39 IST2015-09-04T00:36:08+5:302015-09-04T00:39:04+5:30
सारोळा : दारूमुळे संसाराची होणारी राखरांगोळी, उद्ध्वस्त होणारी युवा पिढी आणि पोलिसांनी अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्याकडे केलेले दुर्लक्ष

सारोळ्यातील दोन दारुअड्डे उद्ध्वस्त
सारोळा : दारूमुळे संसाराची होणारी राखरांगोळी, उद्ध्वस्त होणारी युवा पिढी आणि पोलिसांनी अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्याकडे केलेले दुर्लक्ष यामुळे संतापलेल्या सारोळा (बु़ता़उस्मानाबाद) येथील रणरागिनींनी गुरूवारी सकाळी रस्त्यावर उतरल्या़ दोन दारूविक्रेत्यांच्या घरातील दारू नष्ट करण्यात आली तर गावच्या शिवारात असलेले दोन दारूचे अड्डे उध्दवस्त करण्यात आले़
सारोळा (बु़) गावात काहीजणांनी खुलेआम घरातूनच अवैध दारूविक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे़ तर गावाच्या शिवारात थेट हातभट्टी दारू तयार करण्याचे अड्डे तयार करण्यात आले आहेत़ गावात व गावाच्या शिवारात हातभट्टी दारू मिळत असल्याने गावातील तळीरामांची संख्या वाढली होती़ शिवाय त्यामुळे भांडण-तंटेही वाढले होते़ परिणामी अनेकांचे संसार उध्वस्त झाले असून, युवा पिढीही व्यसनाधीन झाली आहे़ उस्मानाबाद ग्रामीण पोलिसांना वेळोवेळी कारवाईची मागणी केल्यानंतरही केवळ नावालच कारवाई करण्यात येत होती़ त्यानंतर खुलेआम दारूविक्री काही तासातच सुरू होत होती़ सारोळा येथील महिलांनी उपसरपंच कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुक्ताबाई चिलवंत, मिराबाई नरसुडे, ताई गोरे, लक्ष्मी शिंदे, मई फडके, पद्मबाई कठारे, मंगल रसाळ, संगिता कासार, साखराबाई काकडे, विमल रणदिवे, काशीबाई रणदिवे, नाना साळुंके, दादा सुरवसे, अमोल शिंदे, शैलेश शिंदे, शाम शिंदे, ज्योतीराम रणदिवे, चंद्रकांत मसे, अनंत रसाळ, महेश उकिरडे यांच्यासह शेकडो महिला- नागरिकांनी गुरूवारी सकाळी दारूविक्री करणाऱ्या कविता साळुंके व सविता साळुंके यांच्या राहत्या घरावरच मोर्चा नेला़
कविता साळुंके यांनी घरातील टँकमध्ये ठेवलेली २५ ते ३० लिटर दारू हस्तगत करून ती नष्ट केली़ तर सविता साळुंके यांनी महिला येत असल्याचे समजताच दारू ओतून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला़ त्यानंतर ग्रामस्थांनी गावाच्या परिसरातील पारधी वस्तीवरील दारूअड्ड्याकडे मोर्चा वळविला़ तेथील २५ ते ३० लिटर दारू नष्ट करण्यात आली़ त्यानंतर या महिलांनी गावाच्या शिवारातील नदीच्या आवारात असलेल्या दारू अड्ड्याकडे मोर्चा वळविला़ तेथील राजाभाऊ पवार नामक इसम घटनास्थळावरून पसार झाले़ तेथील साहित्यही महिलांनी जप्त केले़ या कारवाईत महिलांनी एकूण ४०० लीटर दारू नष्ट केली़ संतापलेल्या महिला दारूविक्रेत्यांविरोधात रस्त्यावर उतरल्याची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोनि बाळासाहेब गावडे यांनी पोना सुहास गवळी, गावडे आदींच्या फौजफाट्यासह सारोळा गावाकडे धाव घेतली़
महिलांनी दर्शविलेल्या घटनास्थळांचा पोलिसांनी पंचनामा करून मिळेल ते साहित्य जप्त केले़ तसेच साखराबाई पवार, कविता साळुंके, सविता साळुंके या तिघींना ताब्यात घेतले़ या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंदविण्यात आला आहे़ (वार्ताहर)