‘डेप्युटी सीईओं’च्या दालनास लावले टाळे
By Admin | Updated: June 17, 2014 01:11 IST2014-06-17T00:29:26+5:302014-06-17T01:11:43+5:30
बीड : येथील जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागातील उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनास अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला यांनी सोमवारी टाळे ठोकले.

‘डेप्युटी सीईओं’च्या दालनास लावले टाळे
बीड : येथील जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागातील उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनास अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला यांनी सोमवारी टाळे ठोकले. त्यामुळे एकच खळबळ उडाली.
जिल्हा परिषदचे उपमख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) आर. आर. भारती यांच्याकडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचाही प्रभाारी कार्यभार आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे हे रजेवर गेल्याने भारतींंकडे अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे. दरम्यान, जि.प. अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला हे सोमवारी दुपारी चार वाजता सामान्य प्रशासन विभागात पोहोचले. तेंव्हा उपमुख्य कार्यकारी अधिकारी भारती हे आपल्या दालनात नव्हते. त्यामुळे अध्यक्ष अब्दुल्ला यांनी त्यांच्या दालनास टाळे ठोकले. त्यामुळे कर्मचारीही धास्तावले.
हो, मीच लावले टाळे!
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, मी सामान्य प्रशासन विभागात तीन चकरा मारल्या. मात्र, भारती हजर नव्हते. त्यामुळे मीच कुलूप लावले. इतर सर्व अधिकारी उपस्थित होते असा दावाही त्यांनी केला. दांड्याबहाद्दर अधिकारी, कर्मचाऱ्यांची गय नाही असा इशारा त्यांनी दिला.
भारती म्हणाले, बैठकीत होतो!
उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर. आर. भारती यांनी सांगितले की, कोणालाही विचारा मी दिवसभर बैठकीतच होतो. सीईओंच्या केबिनमध्ये मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची बैठक मी घेतली. माझ्या दालनात बसून मी अनेक संचिका हातावेगळ्या केल्या. मी दालनात नेहमी हजर असतो. आरोप चुकीचे आहेत.
कुलूप कशामुळे?
झेडपीआरच्या २०१४- १५ या वर्षातील पाऊणे तीन कोटी रुपयांची कामे प्रस्तावित आहेत. मात्र, प्रस्तावित केलेली कामे नियमबाह्य आहेत. या कामांसाठी अद्याप निधीही उपलब्ध नाही. या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यासाठी आर. आर. भारतींवर दबाव आहे; परंतु भारतींनी स्वाक्षरीस नकार दिला. त्यामुळे त्यांच्या केबिनला टाळे ठोकल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)
सत्ताधाऱ्यांची मनमानी
भाजपाचे गटनेते मदनराव चव्हाण म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी जिल्हा परिषदेत मनमानी चालवली आहे. अध्यक्ष अब्दुल्लांनी भारतींनाच का टार्गेट केले? हे समोर आले पाहिजे. सीईओ राजीव जवळेकर व इतर काही अधिकारी नेहमीच गायब असतात. ते अध्यक्षांना दिसत नाही का? असा सवालही चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.