डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण वाढले
By Admin | Updated: May 26, 2014 01:15 IST2014-05-26T00:51:16+5:302014-05-26T01:15:23+5:30
औरंगाबाद : औरंगाबाद शहरात डेंग्यूसदृश आजाराच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. या आजारात रुग्णाच्या शरीरातील पांढर्या पेशींची संख्या अचानक कमी होते.

डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण वाढले
औरंगाबाद : औरंगाबाद शहरात डेंग्यूसदृश आजाराच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. या आजारात रुग्णाच्या शरीरातील पांढर्या पेशींची संख्या अचानक कमी होते. अशा वेळी रुग्णास तातडीने रक्तघटक असलेल्या पांढर्या पेशी द्याव्या लागतात. त्यामुळे येथील विविध रक्तपेढ्यांकडे पांढर्या पेशींची मागणी वाढली आहे. डास चावल्यामुळे डेंग्यू, मलेरिया असे साथरोग होतात. उन्हाळा व पाणीटंचाईमुळे बहुतेक जण पाणी साठवून ठेवत आहेत. त्यामुळे घराघरांत रांजण, माठ आणि लहान-मोठी भांडी पाण्याने भरलेली दिसतात. वापरासाठी साठविलेले पाणी, कूलरमधील पाण्यात डास अंडी घालतात. त्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे त्यांचे डास बनतात. याविषयी डॉ. विशाल ढाकरे यांनी सांगितले की, एडिस इजिप्ती डास चावल्यानंतर डेंग्यू होतो. डेंग्यू आजारात रुग्णास ताप येतो. या तापेकडे दुर्लक्ष केल्यास रुग्णाच्या रक्तातील पांढर्या पेशींची संख्या अचानक घटते. पांढर्या पेशी ५० हजार ते २० हजारांपर्यंत कमी होताच रुग्णाच्या शरीरात रक्तस्राव होण्याचा धोका असतो. त्याला अशक्तपणा येतो आणि दम लागतो. रक्ततपासणी केल्यानंतरच या आजाराचे निदान होते. रुग्ण जेव्हा डॉक्टरांकडे जातो, तेव्हा त्याच्या प्रकृतीनुसार त्यास अॅडमिट केले जाते. बर्याचदा रुग्णास आयसीयूमध्ये भरती करावे लागते. त्याला रक्त ाच्या पेशी द्याव्या लागतात, असे ढाकरे म्हणाले. डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी डासांची पैदास रोखणे आवश्यक आहे. पावसाळ्यात पाण्याचे डबके साचून तेथे डासांची पैदास होते. त्यामुळे पावसाळ्यात घराशेजारी पाण्याचे डबके साचू देऊ नका, असा सल्ला डॉ. ढाकरे यांनी दिला. शहरातील विविध खाजगी रुग्णालयांत डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण मोठ्या संख्येने उपचार घेत आहेत. या रुग्णांच्या शरीरातील पांढर्या पेशी कमी झाल्या असल्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पांढर्या पेशी आणण्यास सांगितले जाते. त्यामुळे रक्तपेढीत आता पांढर्या पेशींच्या बॅगची मागणी वाढली आहे.