जनतेची अपेक्षापूर्ती करणार- दानवे
By Admin | Updated: May 30, 2014 00:28 IST2014-05-29T23:32:51+5:302014-05-30T00:28:04+5:30
जालना : माझ्या अंगी कधी आमदारकी, खासदारकी शिरली नाही. त्यामुळे आता केंद्रीय मंत्रिपदही शिरणार नाही.

जनतेची अपेक्षापूर्ती करणार- दानवे
जालना : माझ्या अंगी कधी आमदारकी, खासदारकी शिरली नाही. त्यामुळे आता केंद्रीय मंत्रिपदही शिरणार नाही. जनतेचा सेवक म्हणूनच काम करून जनतेच्या अपेक्षांची आपण पूर्ती करू, अशी ग्वाही केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी गुरूवारी जाहीर सत्काराला उत्तर देताना दिली. येथील मामा चौकात सायंकाळी ६.३० वाजता झालेल्या या सभेसाठी व्यासपीठावर माजी मंत्री हरिभाऊ बागडे, सेनेचे जिल्ह्याचे संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, आ. संतोष सांबरे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष बबनराव लोणीकर, सेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए.जे. बोराडे, रिपाइंचे अॅड. ब्रह्मानंद चव्हाण, उपनेते लक्ष्मण वडले, सहसंपर्कप्रमुख शिवाजीराव चोथे, अनिरुद्ध खोतकर, जि.प. उपाध्यक्ष राहुल लोणीकर, पंडितराव भुतेकर, शहरप्रमुख विष्णू पाचफुले, रामेश्वर भांदरगे, उद्योजक किशोर अग्रवाल, भानुदास घुगे, भाऊसाहेब घुगे आदींची प्रमुख उपस्थिती होती. आपल्या सत्काराला उत्तर देताना दानवे पुढे म्हणाले की, केंद्रीय राज्यमंत्री या पदावर काम करताना आपण पूर्ण क्षमतेने, ताकदीने जिल्ह्यातील जनतेसाठी काम करू. मोदी यांच्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाली, याचा अधिक आनंद आपणास झालेला आहे. पंतप्रधान मोदी यांनी सर्व मंत्र्यांना १८ तास जनतेसाठी काम करा, असे आदेश दिलेले आहेत. मी दिल्लीमध्ये जेवढा वेळ काम करेल, तेवढाच वेळ मतदारसंघातील जनतेसाठी देईल, असा विश्वासही दानवे यांनी व्यक्त केला. यावेळी संपर्कप्रमुख मिर्लेकर यांनी १६ मे रोजी संपूर्ण देशात क्रांती झाल्याचे सांगत काँग्रेस आघाडी सरकारवर टीका केली. जिल्ह्यातील प्रश्न दानवे यांच्याकडून सुटतील, अशी अपेक्षाही व्यक्त केली. बागडे यांनी ही सत्काराची सभा तर आहेच, परंतु मतदारांचे आभार मानणारी सभा देखील असल्याचे सांगितले. अन्न पुरवठा वितरण या खात्याच्या माध्यमातून दानवे यांच्याकडून गोरगरिबांच्या भुकेचा प्रश्न सुटेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. सूत्रसंचालन हरिभाऊ शिंदे यांनी केले. तर आ. सांबरे यांनी आभार मानले. यावेळी दिनेश फलके, राजेश सोनी, दीपक टेकाळे, संजय खोतकर, बाला परदेशी, किशोर पांगारकर, रवींद्र देशपांडे, सतीश अकोलकर, श्रीकांत पांगारकर, संजय हर्षे, बळीराम खटके, सविता किवंडे, गंगूबाई वानखेडे, नंदा वाढेकर, रेखा गाडेकर यांच्यासह महायुतीच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. ‘अन्न सुरक्षे’ तील त्रुटी दूर करणार केंद्रीय राज्यमंत्री दानवे आपल्या भाषणात म्हणाले की, अन्नसुरक्षा विधेयकातील काही त्रुटी दूर करणे गरजेचे आहे. ४ जून रोजी पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात बैठक होणार आहे. या त्रुटी दूर करून त्यात दुरूस्त्या करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. माजी मंत्री खोतकर यांनी आपल्या भाषणातून दानवे यांना मंत्रिपदाचा लाल दिवा मिळणार, अशी आपणास अपेक्षा होती, ती पूर्ण झाली. केंद्रात प्रथमच जालन्याला मंत्रिपद मिळाल्याने जिल्ह्यातील प्रश्न तातडीने सुटण्यास मदत होईल, असा विश्वास खोतकर यांनी व्यक्त केला. लोणीकर यांनी गेल्या विधानसभेत युतीमधील काही बेईमान लोकांमुळे आमचा पराभव झाला, मात्र यावेळी तसे होणार नाही, अशी खात्री दर्शविली. याप्रसंगी चोथे, वडले, चव्हाण यांचीही भाषणे झाली. आठवण दानवे यांनी आपल्या भाषणातून मंत्रिपदाच्या शपथविधीला आजारपणामुळे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी येऊ शकले नाहीत, अशी खंत व्यक्त केली. त्याचवेळी शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचीही आठवण काढून ते शपथविधीला उपस्थित राहिले असते तर अत्यानंद झाला असता, असे उद्गार दानवेंनी काढताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. दुसर्या लाल दिव्याची प्रतीक्षा आगामी दोन-तीन महिन्यानंतर राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे जनतेला आता दुसर्या लाल दिव्याचा सत्कार करण्याची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे दानवे म्हणाले.