पोलिस-भाजप कार्यकर्त्यांत वाद
By Admin | Updated: July 10, 2014 01:02 IST2014-07-10T00:48:07+5:302014-07-10T01:02:10+5:30
लातूर : परवाच काँग्रेसमधून भाजपात आलेल्या शैलेश लाहोटी यांच्या वाढदिवसाच्या बॅनर्सवरून बुधवारी पोलिस व भाजप कार्यकर्त्यांत वाद झाला.

पोलिस-भाजप कार्यकर्त्यांत वाद
लातूर : परवाच काँग्रेसमधून भाजपात आलेल्या शैलेश लाहोटी यांच्या वाढदिवसाच्या बॅनर्सवरून बुधवारी पोलिस व भाजप कार्यकर्त्यांत वाद झाला. या प्रकरणी गांधी चौक पोलिसांनी कार्यकर्त्यांवर सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
काँग्रेसचा ‘हात’ सोडून भाजपवासी झालेल्या शैलेश लाहोटी यांच्या वाढदिवसानिमित्त शहरभरात भाजप कार्यकर्त्यांकडून बुधवारी बॅनर्स लावण्यात येत होते. त्यापैकीच काही बॅनर्स लातुरातील हनुमान चौकातही लावण्यात आले. परंतु, रहदारीला अडथळा होत असल्याचा दावा करीत गांधी चौक पोलिसांनी होमगार्डच्या मदतीने बॅनर काढण्याचा प्रयत्न केला. ही बाब समजताच भाजपाचे मोहन माने, अभिमन्यू हिरास, बालाजी सुतार, भाऊसाहेब गलांडे यांच्यासह इतर तीन-चार कार्यकर्ते हनुमान चौकात जमले. त्यानंतर पोलिस व भाजप पदाधिकारी-कार्यकर्त्यांमध्ये बॅनरवरून वाद झाला. त्यामुळे पोलिसांनी उपरोक्त पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन पोलिस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सार्वजनिक शांततेचा भंग करीत जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी कलम १३५ बीपी अॅक्टनुसार गांधी चौक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. (प्रतिनिधी)
कार्यकर्त्यांचे पोलिसांवर आरोप...
मोहन माने यांनी प्रसिद्धीपत्रक जारी करून पोलिसांवर आरोप केले. बॅनर काढण्याचे काम मनपाचे असताना पोलिस कोणाच्या सांगण्यावरून बॅनर काढत होते. तसेच चोर-दरोडेखोरांप्रमाणे आम्हाला मारहाण करीत फरफटत नेण्याचा किळसवाणा प्रकार कोणाच्या सांगण्यावरून पोलिसांनी केला, असा सवालही माने यांनी केला आहे.
सकाळी मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने शिवाजी चौकापासून बॅनर काढणे सुरू केले होते. त्यांनी हनुमान चौकातील भाजपचे बॅनर काढल्यानंतर त्यांच्याशी कार्यकर्त्यांनी वाद घातला. त्यामुळे काढलेले बॅनर तसेच टाकून मनपाचे पथक परतले. रस्त्यावर पडलेले बॅनर घडी घालताना पोलिस दिसल्याने नंतर आलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनीच बॅनर हटविल्याचा आरोप केला आहे. त्यांनी एकत्र जमून घोषणाबाजी केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती पोनि. बालाजी सोनटक्के यांनी दिली.