दत्तमंदिर विकास कामांनी बहरणार

By Admin | Updated: December 25, 2015 00:04 IST2015-12-24T23:56:44+5:302015-12-25T00:04:34+5:30

राजेश गंगमवार, बिलोली शहराच्या दक्षिणेला असलेल्या दत्त मंदिराच्या ६२ एकर परिसराला राज्य शासनाने वनजंगल विभागातंर्गंत पर्यटनस्थळ म्हणून घोषित केले.

Dattamandir Vikas will grow with work | दत्तमंदिर विकास कामांनी बहरणार

दत्तमंदिर विकास कामांनी बहरणार

राजेश गंगमवार, बिलोली
शहराच्या दक्षिणेला असलेल्या दत्त मंदिराच्या ६२ एकर परिसराला राज्य शासनाने वनजंगल विभागातंर्गंत पर्यटनस्थळ म्हणून घोषित केले. याअंतर्गंत तब्बल साडेचार कोटी रुपये मंजूर झाले़ वनजंगल विभागाच्या अंतर्गत सन २०२० पर्यंत टप्प्याटप्प्याने कामे करण्याचे आदेश जारी झाले़ यामार्चअखेर ५० लाखांची कामे पूर्ण करावयाची आहेत़ याच अनुषंगाने टेकडीवरील ६२़५ एकर (२५ हेक्टर) जमिनीची मोजणी पूर्ण करण्यात आली आहे़
मराठवाड्यात सर्वात जास्त महसूल मिळवून देणारा तालुका म्हणून बिलोलीची ओळख आहे़ नांदेड-हैदराबाद महामार्गावर असलेल्या बिलोली शहरात महसूल विभागाची ३०० एकर, मोठ्या व लहान तलावाची मिळून १२५ एकर तर वन विभागाची ६२ एकर जमीन सातबारांवर नोंद आहे़ दरम्यान, जवळपास १५ ते १६ मीटर उंचीवर बिलोलीची दत्त मंदिराची टेकडी आहे़ टेकडीवरून आसपासची १०-१२ गावे सहज नजरेत येतात़ येथील निसर्ग-रम्य परिसराला भौगोलिक वरदान आहे़ याच भागात वनविभागाची ६२ एकर जंगलाची जमीन आहे़ गतवर्षीच तत्कालीन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्या हस्ते वनपाल व वनसंरक्षकांसाठी निवास बांधण्यात आले़ वनविभागाच्या या जमिनीवर कुठेच अतिक्रमण होणार नाही याबाबत नेहमीच खबरदारी घेण्यात आली़
आता पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर याच निसर्गरम्य ६२ एकरच्या परिसराला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात आला़ आॅक्टोबर-२०१५ मध्ये निघालेल्या अधिसूचनेनुसार सन २०२० पर्यंत टप्प्याटप्प्याने कामे करावयाची आहेत़ सन २०१५ अंतर्गत ५० लाखांची कामे विभागामार्फत प्रारंभ करण्यात आली़ उंच टेकडीवर पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी सर्वप्रथम वनतळे निर्माण करण्यात आले़ आता इको टुरिझमच्या अनुषंगाने प्रथम वर्षात पूर्व पावसाळी कामे युद्धपातळीवर हाती घेतली जातील यासाठी वनक्षेत्रात रोपवण, दुसऱ्या वर्षात औषधी वनस्पती व बांबू लागवड, माती बंधारे तसेच काटेरी वनस्पतीच्या लागवडीचे प्रावधान ठेवण्यात आले़
सन २०२० पर्यंत २० विविध कामांच्या योजनांची यादीच वनविभागाकडून जारी करण्यात आली़ पण सन २०१५ मधील ५० लाखांच्या कामात पर्यटनस्थळांच्या मुलभूत कामांचा समावेश करण्यात आला़ पाणीपुरवठा, सौर उर्जेवरील दिवे, भाविकांसाठी प्रसाधनगृह, झाडांना ओटे, आकर्षक स्वागत कमान, संपूर्ण परिसराचा माहिती फलक, बालउद्यान निर्मिती, निसर्ग परिक्रमा पथ, निसर्ग परिचय केंद्र, वन्यप्राणी शिल्प, अंतर्गत रस्ते, सुशोभिकरण व पर्यटक सोयीसुविधा, पाणवठ्यांची निर्मिती, पगोड्यांची निर्मिती, सिंचन व्यवस्था पाठोपाठ ६२ एकर परिसर एकाच नजरेत येण्यासाठी उंच मनोरा (टॉवर) बांधण्यात येईल़ बांधकामासंदर्भातील सर्व कामे याच वर्षात पूर्ण केली जातील़
आता आगामी काळात अशा अत्याधुनिक विकास कामांमुंळे बिलोली शहराची वेगळी ओळख पर्यटनस्थळ म्हणून होणार, यात तीळमात्र शंका नाही़ दत्त मंदिराच्या शेजारीच दिंडोरी प्रणित श्रीस्वामी समर्थाचे मंदिरही एक वेगळे श्रद्धास्थान झाले आहे़

Web Title: Dattamandir Vikas will grow with work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.