बाजारपेठेत डिएपी खताचा तुटवडा
By Admin | Updated: June 18, 2014 01:42 IST2014-06-18T00:55:28+5:302014-06-18T01:42:15+5:30
शिरूर अनंतपाळ : सोयाबीनचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांचा डिएपी खत वापरण्याकडे कल असतानाच ऐन खरीप हंगामाच्या सुरवातीलाच तालुक्यात डिएपी खताचा तुटवडा निर्माण झाला

बाजारपेठेत डिएपी खताचा तुटवडा
शिरूर अनंतपाळ : सोयाबीनचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांचा डिएपी खत वापरण्याकडे कल असतानाच ऐन खरीप हंगामाच्या सुरवातीलाच तालुक्यात डिएपी खताचा तुटवडा निर्माण झाला असून, शेतकऱ्यांना डिएपी खताची प्रतीक्षा लागली असल्याने शेतकरी विविध कृषी सेवा केंद्राच्या दुकानावर खताचा तुटवडा असल्याचाच अनुभव येत असल्याचे चित्र दिसून येत आहे़
शिरूर अनंतपाळ तालुका सोयाबीन उत्पादनात मराठवाड्यात अव्वल आला तेव्हापासून तालुक्यातील सोयाबीन लागवडीचे क्षेत्र प्रत्येक वर्षी वाढत चालले असून, चालू वर्षातील खरीप हंगामात किमान २० हजार हेक्टर्सवर सोयाबीनची पेरणी केली जाईल, असा निष्कर्ष कृषी खात्याने काढला असून, यासाठी बियाणांबरोबरच खतही जादा लागणार आहे़ डिएपी खताचा वापर केला तर सोयाबीनचे हमखास उत्पादन भरघोस मिळते, अशी धारणा शेतकरी वर्गाची झाली आहे़ यासाठी खरीप हंगाम सुरु होण्यापूर्वी शेतकरी डिएपी खताची खरेदी करण्याच्या प्रयत्नात असून, तालुक्यात असलेल्या विविध कृषी केंद्रावर खेटे घालत आहेत़ परंतु, सद्य:स्थितीत बाजारपेठेत डिएपी खताचा तुटवडा असल्याने शेतकऱ्यांना या खताची पतीक्षा लागली आहे़
परिणामी खरीप हंगामाच्या पेरण्यांना सुरुवात होण्यापूर्वी तालुक्याला डिएपी खताचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांतून केली जात आहे़ (वार्ताहर)
संपाचा परिणाम़़़
याबाबत येथील बाजारपेठेतील कृषी सेवा केंदाच्या विविध विके्रत्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, सध्या कामगारांचा संप सुरु असून, संपामुळे खत कंपनीकडून खत उपलब्ध होत नाही़ कामगारांचा संप मिटल्यावर खत उपलब्ध होईल, असेही यावेळी सांगण्यात आले़
डिएपी वापरल्याने विक्रमी उत्पादन मिळते ही शेतकऱ्यांची समजूत दूर करणे गरजचे आहे़ कृषी खात्याच्या वतीने आयोजित बैठकांमध्ये आम्ही समजूत दूर करू, असे तालुका कृषी अधिकारी डी़बी़सुतार, अनंत गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़