विद्युत तारांचा रहिवाशांना धोका
By Admin | Updated: August 7, 2014 23:33 IST2014-08-07T23:14:11+5:302014-08-07T23:33:28+5:30
बीड : शहरातील अनेक भागात विद्युत तारा लोंबकळल्याने त्या घराच्या छताजवळ आल्या आहेत.

विद्युत तारांचा रहिवाशांना धोका
बीड : शहरातील अनेक भागात विद्युत तारा लोंबकळल्याने त्या घराच्या छताजवळ आल्या आहेत. काही तारा तर चक्क छताला चिटकल्या आहेत. यामुळे अनुचित प्रकार घडण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
बीड शहरतील नवनाथ नगर, हनुमान नगर, मोंढा परिसर, तेलगाव नाका, बार्शी नाका, रविवार पेठ, शनि मंदिर गल्ली यासह इतर भागात विद्युत व्यवस्थेसाठी विद्युत खांब बसविण्यात आले आहेत. यातून विद्युत ग्राहकांना विद्युत जोडणी दिलेली आहे.
असे असले तरी अनेक ठिकाणी विद्युत तारा लोंबकळल्या आहेत. काही ठिकाणी तर तारा छताच्या अगदीच जवळ आल्या आहेत. अनेक नागरिकांचे दोन ते तीन मजली घर आहे. अशा घराजवळून विद्युत तारा अगदीच चिकटून गेल्याने या तारा घराच्या गॅलरीमधून हाताचा स्पर्श होईल, अशा अंतरावर आहेत. यामुळे लहान मुलांचा खेळताना विद्युत तारांना स्पर्श होईल, याची भितीही नागरिकांमध्ये असते.
अनेकदा महिलांना छतावर धुणे किंवा इतर वस्तू वाळविण्यासाठी ठेवाव्या लागतात. अशावेळी महिलांचा तारांना स्पर्श होऊ शकतो, याचा धोकाही आहे. अनेक नागरिकांनी घरावरील तारा हटविण्यात मागणी केली आहे. मात्र, याकडे महावितरण दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे. तसेच काही नागरिकांच्या छतावरून तारा आडव्या गेल्या आहेत. यामुळे नागरिकांना दुसरा मजला बांधण्यासही अडचणी येत आहेत.
शहरातील काही भागातून रस्ता ओलांडूनही तारा गेल्या आहेत. अशा काही ठिंकाणच्या तारा अत्यंत सैल झाल्या असल्यामुळे त्या खाली आल्या आहेत. अनेकदा जड वाहने किंवा माल असलेली वाहने रस्ता ओलांडताना त्यांचा विद्युत तारांना स्पर्श होता. अनेकदा तारांमध्ये ठिणग्याही उडतात. यामुळे मोठी दुर्घटना होण्याची भीतीही नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
शहरात घडल्या दुर्घटना
शहरातील अनेक भागातील विद्युत तारा सैल झाल्या आहेत. यामुळे शहरातील अनेक ठिकाणी विद्युत तारांचा स्पर्श होऊन विजेचा धक्का लागण्याच्या घटना घडलेल्या आहेत. (प्रतिनिधी)
तारांचा धक्का लागण्याच्या घडल्या घटना
धोका होण्यापूर्वी दुरस्ती करावी
शहरातील हनुमान नगर, नवनाथ नगर आदीसह इतर ठिकाणी नागरिकांच्या घरावर विद्युत तारा आलेल्या आहेत. नागरिकांना बांधकाम करण्यातही अडचणी येत आहेत. याप्रकारामुळे काही दुर्घटना होऊ नये, यासाठी महावितरणने संबंधित ठिंकाणच्या विद्युत तारा दुरुस्त कराव्यात अशी मागणी अंगद मुळे, अशोक डोईफोडे आदींनी केली आहे.
उपाययोजना सुरू आहेत- केंद्रे
शहरातील अनेक ठिंकाणच्या विद्युत तारा नागरिकांच्या छताजवळ आल्या आहेत तसेच तारा सैलही झाल्याने दुर्घटना होत आहेत, या बाबत महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता एम. एच. केंद्रे म्हणाले की, शहरातील अनेक ठिकाणच्या तारा दुरुस्त केल्या आहेत. तसेच शंभरपेक्षा अधिक ठिकाणी रोहित्र बसविण्यात आले आहेत. काही अनुचित घटना घडू नये यासाठी काळजी घेतली जात आहे.