रोज दोन शेतकऱ्यांची आत्महत्या
By Admin | Updated: May 26, 2015 00:50 IST2015-05-26T00:27:33+5:302015-05-26T00:50:26+5:30
औरंगाबाद : हवामानातील बदल, शेतीचा वाढता उत्पादन खर्च आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे आलेला कर्जबाजारीपणा हा शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे.

रोज दोन शेतकऱ्यांची आत्महत्या
औरंगाबाद : हवामानातील बदल, शेतीचा वाढता उत्पादन खर्च आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे आलेला कर्जबाजारीपणा हा शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे. विभागातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरू असून, २४ मेपर्यंत ३४६ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. १ जानेवारी ते २४ मे २०१५ पर्यंतच्या १४४ दिवसांत रोज दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे प्रमाण येत आहे. यावरून दिसते की, विभागात दुष्काळ आणि नापिकीचा सर्वांत जास्त फटका शेतकऱ्यांना बसतो आहे.
बीड जिल्ह्यातील सर्वाधिक ९८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. २०० शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासनाने १ कोटी ७१ लाख रुपयांची मदत केल्याचा दावा केला आहे. विभागीय आयुक्तांनी शासनाकडे आज शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा साप्ताहिक अहवाल पाठविला आहे. जानेवारीपासून आजवर विभागातील शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस, गारपीट आणि दुष्काळाचा सामना करावा लागला. रबीचे पीक या अस्मानी संकटामुळे हातातून गेले. दुष्काळामुळे पशुधनालाही फटका बसला. विभागाला मागील तीन वर्षांपासून दुष्काळाचा सामना करावा लागत असल्यामुळे त्याचा आर्थिक, सामाजिक परिणाम होतो आहे.
विभागातील ३४६ आत्महत्या प्रकरणांपैकी प्रशासनाने ४८ प्रकरणांत मदत नाकारली आहे. ९८ प्रकरणांची चौकशी सुरू आहे. २०० प्रकरणांत प्रशासनाने मदत केली आहे. १ कोटी ७१ लाख रुपयांची ती मदत आहे. ४८ प्रकरणांत मदत नाकारण्यामागे प्रशासनाने स्पष्ट मत नोंदविलेले नाही.
उस्मानाबादला १०० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. रबी हंगामात झालेल्या गारपिटीच्या नुकसानभरपाईसाठी तो निधी आला आहे.
४तो निधी मिळाला नसल्याने प्रशासनाने शासनाकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. सोमवारी तो निधी विभागीय आयुक्तालयाला प्राप्त झाल्याचे सूत्रांनी सांगितले.