फसवणूक करणाऱ्या बिल्डरांवर फौजदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2016 00:42 IST2016-04-21T00:10:50+5:302016-04-21T00:42:04+5:30
औरंगाबाद : शासनाने दहा वर्षांपूर्वी बिल्डरांसाठी सेल्फ डेव्हलपमेंटची योजना आणली होती. या योजनेचा लाभ औरंगाबाद शहरात अनेक बिल्डरांनी घेतला.

फसवणूक करणाऱ्या बिल्डरांवर फौजदारी
औरंगाबाद : शासनाने दहा वर्षांपूर्वी बिल्डरांसाठी सेल्फ डेव्हलपमेंटची योजना आणली होती. या योजनेचा लाभ औरंगाबाद शहरात अनेक बिल्डरांनी घेतला. बिल्डरांनी सेल्फ डेव्हलमेंटमध्ये सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही मूलभूत सोयी-सुविधा दिलेल्या नाहीत. बिल्डरांकडून ज्या नागरिकांनी घरे खरेदी केली आहेत, त्यांना सोयी देण्याचे काम मनपाला करावे लागणार आहे. सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बिल्डरांसह मनपातील दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचे आश्वासन मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी दिले.
बीड बायपास येथील समृद्धी पार्क एका बिल्डरने सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये दहा वर्षांपूर्वी उभारले. हा प्रकल्प उभारताना बिल्डरने रस्ते, पाणी, ड्रेनेज, पथदिवे आदी सर्व सोयी सुविधा देण्याचे आश्वासन नागरिकांना दिले. नागरिकांनीही बिल्डरवर विश्वास ठेवून लाखो रुपयांना घरे खरेदी केली. मात्र, मागील काही वर्षांपासून बिल्डर कोणत्याही सुविधा देण्यास तयार नाही. समृद्धी पार्कमधील नागरिकांची अक्षरश: फसवणूक झाली आहे. माणुसकीच्या नात्याने या भागात राहणाऱ्या नागरिकांना मनपाने सोयी सुविधा द्याव्यात, समृद्धी पार्क मनपाकडे हस्तांतरित करून घ्यावा, असा अशासकीय प्रस्ताव या भागातील नगरसेविकेने आज सर्वसाधारण सभेत ठेवला. या प्रस्तावावर राजू वैद्य, अफसर खान, माधुरी अदवंत, स्मिता घोगरे आदींनी सहभाग घेतला. बिल्डरने मनपाकडून बेटरमेंट चार्जेसमध्ये सवलत घेतली असेल. हा निधी वळवून नागरिकांना सोयी सुविधा देता येऊ शकतात असे वैद्य यांनी नमूद केले. इतर काही नगरसेवकांनी बिल्डरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली.
मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी सांगितले की, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल. बांधकाम परवानगी देताना कोणत्या अटी व शर्थी टाकण्यात आल्या होत्या, हे तपासण्यात येईल. मनपातील अधिकारी व बिल्डर दोषी असल्यास त्वरित फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.