जबरीने वर्गणी गोळा करणाऱ्यांवर गुन्हे
By Admin | Updated: September 3, 2015 00:26 IST2015-09-02T22:34:21+5:302015-09-03T00:26:54+5:30
जालना : गणेशोत्सवासाठी वर्गणी गोळा करताना एखाद्या मंडळाने बळजबरी केली तर त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग यांनी दिला आहे.

जबरीने वर्गणी गोळा करणाऱ्यांवर गुन्हे
जालना : गणेशोत्सवासाठी वर्गणी गोळा करताना एखाद्या मंडळाने बळजबरी केली तर त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग यांनी दिला आहे.
गणेशोत्सव व दहिहंडी उत्सवानिमित्त आयोजित शांतता समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी नगराध्यक्षा पार्वतीबाई रत्नपारखे, उपाध्यक्ष शाह आलम खान, तहसीलदार रेवननाथ लबडे, मुख्याधिकारी दीपक पुजारी, महावितरणचे कार्यकारी अभियंता शिवाजी भालशंकर, अप्पर पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, सहाय्यक पोलिस अधीक्षक दीक्षीतकुमार गेडाम उपस्थित होते.
पोलिस अधीक्षक सिंग म्हणाल्या की, जिल्ह्याच्या इतिहासात जातीय सलोखा उत्तम आहे. येथे सर्वधर्मीय नागरिक सर्वच सण उत्सव एकत्रितपणे उत्साहात साजरे करतात. याचे श्रेय हे पोलिसांचे नसून या सर्व नागरिकांनाच आहे. अशाच पद्धतीने यापुढेही उत्सव साजरे करावे. जे काही २ टक्के समाजकंटक असतील त्यांना धडा शिकविण्यासाठी तुम्ही ९८ टक्के लोकांनीच पुढाकार घ्यावा. २ टक्के लोक तुम्हा ९८ टक्क्यांवर भारी पडता कामा नये, पोलिस प्रशासन अशा लोकांना धडा शिकवेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
जालना पालिकेने रस्त्याच्या खड्यांकडे लक्ष देवून ते बुजवावेत. तसेच शहरातील पथदिव्याच्या प्रश्नासाठी आपण स्वत: जातीने लक्ष घालून उत्सवाच्या काळात दहा दिवस पथदिवे सुरू करण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बाबूलाल पंडीत, इकबाल पाशा, इनायत मामू, आयशा खान, जगन्नाथ चव्हाण आदींनी सूचना मांडल्या. यावेळी बाला परदेशी यांनी आपण २५१ रूपयांची पावती देवून वर्गणी जमा करणार आहोत. त्यातील २०१ रूपयांचा विमा वर्गणीधारकांचा भरणार व उर्वरित ५० रूपये हे मंडळासाठी देणार आहोत. याच प्रमाणे अन्य गणेश मंडळानी उपक्रम राबवून नागरिकांचा विमा काढावा, असे आवाहन त्यांनी केले.