देशाला सावरकरांच्या विचारांची गरज

By Admin | Updated: March 14, 2016 00:41 IST2016-03-14T00:24:35+5:302016-03-14T00:41:28+5:30

उस्मानाबाद : देश चहुबाजूने शत्रू राष्ट्राच्या कारवायांमुळे अडचणीत असताना व देशात अतिरेकी कारवाया घडत असताना देशातील तरुणांच्या मनात राष्ट्रप्रेम जागृत करण्यासाठी

The country needs Savarkar's views | देशाला सावरकरांच्या विचारांची गरज

देशाला सावरकरांच्या विचारांची गरज


उस्मानाबाद : देश चहुबाजूने शत्रू राष्ट्राच्या कारवायांमुळे अडचणीत असताना व देशात अतिरेकी कारवाया घडत असताना देशातील तरुणांच्या मनात राष्ट्रप्रेम जागृत करण्यासाठी आज स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांची गरज असल्याचे मत सावरकर यांच्या जीवन चरित्राचे अभ्यासक वा. ना. उत्पात (पंढरपूर) यांनी व्यक्त केले.
शनिवारी स्वा. सावरकर मध्यवर्ती जयंती समितीच्या वतीने शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूल येथे आयोजित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर एक धगधगते यज्ञकुंड’ या विषयावरील व्याख्यान कार्यक्रमात बोलत होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधीर पाटील, सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे, समितीचे अध्यक्ष उमाकांत कुलकर्णी, सचिव पांडुरंग पवार, बाबूराव पूजारी आदींची उपस्थिती होती.
यावेळी उत्पात यांनी सावरकरांच्या जीवन चरित्रातील अनेक प्रसंग सांगितले. आंदमानमध्ये काळ्यापाण्याची शिक्षा भोगत असताना सावरकरांनी काव्यप्रतिभा जागृत ठेवली व ‘कमला’ हे महाकाव्य निर्माण केले. १४ वर्षाच्या बंदीवासानंतर सावरकरांची राजकारण न करण्याच्या अटीवर ब्रिटीशांनी मुक्तता करून त्यांना रत्नागिरीत स्थानबध्द केले. परंतु, त्यांनी सामाजिक कार्याच्या आधारे येथे देखील आपली चळवळ सुरूच ठेवली होती, असे उत्पात म्हणाले. रत्नागिरीच्या स्थानबध्दतेत त्यांनी अस्पृश्यता निवारणासाठी सहभोजन, अस्पृश्यांसाठी हॉटेल उघडले, मंदिर प्रवेशासाठी पतीत पावन मंदिराची निर्मिती आदी समाजोध्दाराचे कार्य सावरकरांनी केले. अन्य कुठल्याही तत्कालीन काँग्रेस नेत्यांनी सावरकरांइतका ब्रिटीशांचा अन्याय सहन केला नाही. सावरकर हे थोर साहित्यिक, महान कवी, क्रांतीकारक होते. त्यांनी भाषा शुद्धीचे व मराठी साहित्यामध्ये मोलाचे योगदान दिले. आज देखील रायगडावर स्वातंत्र्यवीर सावरकर रचित शिवरायांची आरती म्हटली जाते, असे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात जयंती समितीचे अध्यक्ष उमाकांत कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. यावेळी समितीकडून वर्षभर राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. सूत्रसंचालन सुवर्णा कांबळे यांनी तर आभार सचिव पांडुरंग पवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता गीताताई कोंडो यांच्या वंदे मातरम् गीताने झाली. यावेळी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Web Title: The country needs Savarkar's views

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.