नगरसेवकांनी लावले मनपाचे दार
By Admin | Updated: February 3, 2015 00:58 IST2015-02-03T00:30:45+5:302015-02-03T00:58:34+5:30
लातूर : लातूर शहर महानगरपालिकेला विविध योजनेतून मिळालेला कोट्यवधींचा निधी खर्चाअभावी पडून आहे़ सदरील खर्च करण्यात आयुक्त अपयशी ठरल्याचा आरोप करीत

नगरसेवकांनी लावले मनपाचे दार
लातूर : लातूर शहर महानगरपालिकेला विविध योजनेतून मिळालेला कोट्यवधींचा निधी खर्चाअभावी पडून आहे़ सदरील खर्च करण्यात आयुक्त अपयशी ठरल्याचा आरोप करीत माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांनी सोमवारी मनपात आंदोलन केले़ आयुक्तांच्या दालनातील सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढले़ त्यानंतर मनपाच्या समोरील बाजूचे दोन्ही दरवाजे बंद केले़ जवळपास २८ कोटी रुपये शिल्लक असल्याचा दावा करीत सत्ताधारी असलेल्या कांबळे यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे़
२०१२-१३ ते २०१४ या आर्थिक वर्षात दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत मिळालेली रक्कम शिल्लक असतानाही खर्च केली जात नाही, याला आयुक्त सुधाकर तेलंग जबाबदार असल्याचा आरोप कांबळे यांनी केला़ पायाभूत विकास, नगरोत्थान आदी योजनेमधील २८ कोटी ८४ लाख रूपये शिल्लक असतानाही किरकोळ कामांसाठी मनपाकडे निधी नसल्याचे सांगितले जात आहे़ प्रभागातील जलवाहिनीचा पाईट फुटला, व्हॉल्व लिकेज झाले तर नागरिकांची ओरड वाढते, त्यासाठी खिशातून पैसे घालण्याची वेळ आली असल्याचे लक्ष्मण कांबळे यांनी सांगितले़
निधी खर्च होत नसल्यामुळे मी मनपाला कुलुप लावणार होते, परंतू बांधकाम सभापती गिरीष पाटील यांनी मध्यस्थी केल्यामुळे कुलूप लावले नाही़ मनपात कसल्याही प्रकारचे नियोजन नाही़ जवळपास एक तास काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, किशोर राजुरे, रिपाइंचे गटनेते चंद्रकांत चिकटे, शिवसेना गटनेत्या सुनिता चाळक, राष्ट्रवादीचे राजा मणियार हे प्रवेशदारात बसले होते़ यावेळी चंद्रकात चिकटे म्हणाले, प्रशासन आणि महापौर यांच्यात ताळमेळ नाही़ २८ कोटी ८४ लाख रूपये खर्च न केल्याने पडून आहेत़ (प्रतिनिधी)