पालिकेने केली उदगीरकरांची दिशाभूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2016 00:26 IST2016-02-08T23:51:27+5:302016-02-09T00:26:52+5:30
चेतन धनुरे , उदगीर उदगीर शहराच्या भीषण टंचाईत पालिकेने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहे़ परंतु, आपण उदगीरकरांसाठी काहीतरी करतोय् हे

पालिकेने केली उदगीरकरांची दिशाभूल
चेतन धनुरे , उदगीर
उदगीर शहराच्या भीषण टंचाईत पालिकेने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहे़ परंतु, आपण उदगीरकरांसाठी काहीतरी करतोय् हे दाखविण्याच्या घाई झालेल्या पालिकेने अतिउत्साहात टँकरचे वेळापत्रक जाहीर केले़ परंतु, गेल्या दोन दिवसांपासून पाण्याअभावी टँकरच बंद असल्याने वेळापत्रक सपशेल खोटे पडले अन् पालिकेला अतिउत्साहात तोंडावर पडण्याची वेळ आली़
उदगीर शहरात पाण्याची भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनेची मागणी शासनाने उडवून लावल्यामुळे सध्या आहे त्या स्त्रोतातून पाणी मिळविण्यासाठी उपाय योजना राबविल्या जात आहेत़ विहिरींचा गाळ काढण्याची मोहिम अर्ध्यातच सोडून दिल्यानंतर आता दोन दिवसांपूर्वीच टँकरचे वेळापत्रक नगरपालिकेने जाहीर केले़ त्यात ६ फेब्रुवारीपासून ते २८ फेब्रुवारी पर्यंत कोणत्या भागात कोणत्या तारखेस टँकरने पाणी पुरविण्यात येईल, याची माहिती जाहीर करण्यात आली आहे़ परंतु, या वेळापत्रकाच्या पहिल्याच दिवसापासून पालिकेला ‘बोले तैसे चाल’ण्यात अपयश आले आहे़ त्यामुळे संबंधित प्रभागातील नागरिकांना पाण्यासाठी पुन्हा इतरांची ‘पाऊले वंदावी’ लागली़ आता तांत्रिक अडचणीचे कारण देत प्रशासन सारवासारव करु पाहत असले तरी या अडचणींचा अंदाज न घेताच वेळापत्रक जाहीर करण्याचा अतिउत्साह त्यांना चांगलाच अंगलट येत आहे़
आधीच टंचाईच्या वणव्यात भाजून निघालेल्या उदगीरकरांच्या भळभळत्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार पालिकेने केल्याची चर्चा होवू लागली आहे़
लातूर शहरातील टंचाईच्या पार्श्वभूमीवर तेथील टँकरवर निगराणी ठेवण्यासाठी काही नगरसेवकांनी पुढाकार घेवून प्रभागात दक्ष नागरिकांच्या समित्या स्थापन केल्या आहेत़ त्यांच्याद्वारे टँकर नियोजित वेळापत्रकानुसार येतो की नाही यावर लक्ष ठेवून पाण्याचे समान वितरण करण्यात येत आहे़ त्याच पार्श्वभूमीवर उदगीरातही अशा समित्या स्थापन करण्याची गरज आहे़ अन्यथा पाण्यासाठी होणारी भांडणे अन् त्यातून निर्माण होणाऱ्या समस्येला पालिकेसोबतच पोलिसांनाही तोंड द्यावे लागणार आहे़ मात्र, उदगीरच्या नगरसवेकांनी अजून तरी याबाबतीत कुठे पुढाकार घेतल्याचे दिसून येत नाही़