वाढीव मुदतीमुळे शेतकऱ्यांची सोय
By Admin | Updated: August 4, 2014 00:52 IST2014-08-03T23:45:24+5:302014-08-04T00:52:04+5:30
सेनगाव/कळमनुरी : राष्ट्रीय पीकविमा योजनेअंतर्गत विमा भरण्यास मुदतवाढ मिळाल्याने पीकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढणार आहे.

वाढीव मुदतीमुळे शेतकऱ्यांची सोय
सेनगाव/कळमनुरी : राष्ट्रीय पीकविमा योजनेअंतर्गत विमा भरण्यास मुदतवाढ मिळाल्याने पीकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढणार आहे. सेनगाव तालुक्यातील ४ हजार २९९ शेतकऱ्यांनी ३४ लाख ९० हजार रूपयांचा पीकविमा भरला आहे.
पावसाने दडी मारल्याने तालुक्यात खरीप हंगाम धोक्यात सापडला आहे. तब्बल दीड महिना पेरणीस विलंब झाला असून, दुबार पेरणीचे संकट डोकावत असताना राष्ट्रीय पीकविमा योजनेत ३१ जुलैपर्यंत तालुक्यातील ४ हजार २९९ शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेत ३४ लाख ९० हजार रूपयांचा पीकविमा भरला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, मूग, उडीद या पिकांचा पीकविमा शेतकऱ्यांनी भरला आहे.
राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत कळमनुरी तालुक्यातील ४ हजार ९३१ शेतकऱ्यांनी खरीप पिकाचा विमा उतरविला. विम्याची रक्कम ३६ लाख ९४ हजार एवढी आहे. पुन्हा पीकविमा उतरविण्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे. यावर्षी कमी प्रमाणात पाऊस पडला असून, शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरविणे गरजेचे आहे. त्याकरिता यावर्षी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी विमा उतरविण्याचे आवाहनही काळे यांनी केले आहे. पीकविमा उतरविण्यासाठी १६ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कळमनुरी शाखेत १५०० शेतकऱ्यांनी ७ लाख ४५ हजार, आखाडा बाळापूर ९१६ शेतकऱ्यांनी ८ लाख ५५ हजार, कोंढूर येथे ९० शेतकऱ्यांनी ६१ हजार, नांदापूर येथे २२५ शेतकऱ्यांनी १ लाख ९५ हजार, डोंगरकडा येथे ९०० शेतकऱ्यांनी ५ लाख ८८ हजार, पोत्रा येथे १०० शेतकरी ९५ हजार, वारंगाफाटा येथे ५०० शेतकरी ५ लाख ७० हजार, गौळबाजार येथे ७०० शेतकरी ५ लाख ९० हजार असे एकूण ४ हजार ९३१ शेतकऱ्यांनी सोयाबीन, मूग, उडीद, तूर, कापूस या पिकांचा ३६ लाख ९४ हजारांचा विमा उतरविला आहे. सोयाबीनसाठी हेक्टरी ६०२ रुपये कापूस हेक्टरी २ हजार ७५६ रुपये, तूर ४६८ रुपये, मूग ३०३, उडीद ३२८ रुपये प्रमाणे विमा उतरविला आहे. शेतकऱ्यांनी पिकविमा १५ आॅगस्टपर्यंत उतरवा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी काळे यांनी केले आहे. (वार्ताहर)
आता १५ आॅगस्टपर्यंत विमा काढा
राष्ट्रीय पीकविमा योजनेअंतर्गत पीकविमा भरण्याची ३१ जुलै ही अंतिम मुदत होती.
यंदा हिंगोली जिल्ह्यात पाऊस लांबल्याने खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत.
पेरणीपूर्वी पीकविमा कसा भरणार? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता.
पीकविमा भरण्यास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी होत होती. या मागणीची दखल घेत पीक विम्याची मुदत १५ आॅगस्टपर्यंत वाढवून देण्यात आली आहे.
यावर्षी समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने खरीप हंगामातील सर्वच पिके धोक्यात आली आहेत.
बिकट स्थितीत ३१ जुलैपर्यंत विका भरणाऱ्या ४ हजार २९० शेतकऱ्यांचा पीकविमा मंजूर झाला तर ९ कोटी ८५ लाख रुपये अनुदान शेतकऱ्यांना मिळेल.
पीकविमा न काढलेल्या व १ आॅगस्टनंतर पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी १५ आॅगस्टपर्यंत पीकविमा भरावा, असे आवाहन सेनगावचे तालुका कृषी अधिकारी आर.बी.हरणे यांनी केले आहे.