लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महावितरणने ऐन दिवाळीच्या तोंडावर भारनियमन सुरू केले आहे. यामुळे शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या गुलमंडी, मछली खडक, सिटीचौक, सराफा रोड येथील व्यावसायिक उलाढालीवर सुमारे ६० टक्क्यांपर्यंत परिणाम झाला आहे. दररोज दुपारी ३.३० ते ७.३० वाजेपर्यंत भारनियमन होत असल्याने व्यापा-यांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.मछली खडक रोड कपडा, मिठाई मार्केट म्हणून ओळखले जाते. दसरा-दिवाळीदरम्यान या बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी असते, पण नोटाबंदी व जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर येथील उलाढालीवर परिणाम झाला. त्यात ‘तेल’ ओतण्याचे काम महावितरणने सुरू केले आहे. मागील काही दिवसांपासून दुपारी ३.३० ते सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत भारनियमन सुरू केल्याने त्याचा मोठा आर्थिक फटका येथील व्यावसायिकांना बसू लागला आहे. ऐन ग्राहकीच्या वेळी चार तास लाईट गुल होत आहे. प्रत्येक दुकानात इन्व्हेटर नाही. ज्या दुकानात इन्व्हेटर आहेत तेथे उजेड असतो, पण रस्त्यावर मात्र, अंधार असतो. यामुळे ग्राहकही या बाजारात येणे टाळत आहे. यासंदर्भात मिलन मिठाईचे शरद परिहार यांनी सांगितले की, हिवाळ्याचे दिवस सुरू झाले आहे. आता ६ वाजेच्या आत अंधार होत आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी सायंकाळी सुरू होते. पण ७.३० वाजेपर्यंत भारनियमन असल्याने ग्राहकही आता खरेदीसाठी येणे टाळत आहे. एखाद्या दुकानातून ग्राहक गेला तर पुन्हा लवकर येत नाही. यामुळे आर्थिक नुकसान होत आहे. शिवाय ग्राहकीही तुटत आहे, असा दुहेरी फटका व्यावसायिकांना बसत आहे.व्यापारी अजय तलरेजा यांनी सांगितले की, दसरा-दिवाळीदरम्यान १५ दिवसांच्या उलाढालीत व्यापारी तीन महिन्यांची उलाढाल कव्हर करीत असतो. हे दोन्ही सण व्यापाºयांसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. या काळात जर भारनियमन होत असेल तर व्यापाºयांमध्ये संताप होणे साहजिकच आहे. आधीच नोटाबंदी व नंतर जीएसटीमुळे व्यापार बुडीत निघाला आहे. नोकरदारांचेही पगार देणे कठीण झाले आहे. व्यापारी अनेक अडचणीला तोंड देत असताना त्यात भारनियमनाने भर टाकली आहे. महावितरणने कोणत्याही परिस्थितीत सणासुद्धीत भारनियमन करू नये, अशी मागणी व्यापारी करीत आहेत.
भारनियमनामुळे व्यापारावर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 00:32 IST