काँग्रेसचा जिल्हा कचेरीवर महामोर्चा

By Admin | Updated: January 22, 2015 00:43 IST2015-01-22T00:37:40+5:302015-01-22T00:43:56+5:30

लातूर : दुष्काळ निवारण आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रश्नावर काँग्रेस पक्षाच्या वतीने बुधवारी महामोर्चा काढण्यात आला.

Congress's District Caucheryar Mahamarcha | काँग्रेसचा जिल्हा कचेरीवर महामोर्चा

काँग्रेसचा जिल्हा कचेरीवर महामोर्चा



लातूर : दुष्काळ निवारण आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रश्नावर काँग्रेस पक्षाच्या वतीने बुधवारी महामोर्चा काढण्यात आला. शिवाजी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत वाजत गाजत निघालेल्या या महामोर्चाचे नेतृत्व आमदार अमित देशमुख यांनी केले. लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा. वीजबिलाची सक्ती करू नये. अन्यथा वीज कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड करू, असा इशाराही यावेळी आमदार अमित देशमुख यांनी दिला.
आमच्या मागण्या मान्य करा, नाही तर खुर्च्या खाली करा, अशा घोषणा काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोर्चात दिल्या. सकाळी ११.३० वाजता शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या मोर्चाला प्रारंभ करण्यात आला. मोर्चातील बैलगाडीत वाळलेले पीक आणि वाळलेल्या झाडावर गळफास घेतलेल्या शेतकऱ्याची प्रतिकृती मोर्चात लक्षवेधी होती. शासनाचा निषेध आणि घोषणाबाजीत ११.३० वाजता निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी १.३० वाजता धडकला. यावेळी आमदार अमित देशमुख यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात यावा, सिंचन प्रकल्पासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्यात यावा, मनपाला टंचाई निवारणासाठी १० कोटी द्यावेत, जिल्हा परिषदेला ३० कोटी रुपये द्यावेत, कृषीपूरक व कृषी मालावरील प्रक्रिया उद्योगाला ५ लाख रुपये बिनव्याजी कर्ज द्यावे, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, शेतकऱ्यांचे सर्व थकित शेतीपंपाचे वीजबिल माफ करण्यात यावे, दहा तास वीजपुरवठा करण्यात यावा, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींना शेष माफ करावा, पशुधन जगविण्यासाठी चारा उपलब्ध करावा, शेतकऱ्यांना पीकविमा तातडीने द्यावा, शेतकरी हिताच्या विरोधी असलेला भूसंपादनाचा कायदा रद्द करावा, कोरडवाहू शेतीला ७५ हजार व बागायती शेतीला हेक्टरी १ लाख रुपये अनुदान द्यावे, सोयाबीन पिकाला हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, आदी मागण्या करण्यात आल्या. शिष्टमंडळात आमदार त्रिंबक भिसे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. व्यंकट बेद्रे, अ‍ॅड. त्र्यंबकदास झंवर, धीरज देशमुख, अ‍ॅड. विक्रम हिप्परकर, माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर, वैजनाथ शिंदे, महापौर अख्तर मिस्त्री, एस.आर. देशमुख, अशोकराव पाटील निलंगेकर, शिलाताई पाटील आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)४
दुष्काळामुळे शेतकरी संकटात सापडला असताना केंद्र व राज्य शासन मात्र उद्योगपतींचे लाड पुरवीत आहे. कोणत्याही उपाययोजना या शासनाने केल्या नाहीत. शासनाला जागे करण्यासाठी काँग्रेस पक्षाने हा महामोर्चा काढला आहे. तीव्र दुष्काळ असताना लातूर जिल्ह्यात वीजबिलाची सक्तीने वसुली सुरू आहे. हे निषेधार्ह असून, यापुढे वसुली सुरूच ठेवली, तर वीज वितरण कंपनीचे कार्यालय फोडायला आम्ही मागे-पुढे पाहणार नाही. ते करण्यास भाग पाडू नका, असा गर्भित इशारा आमदार अमित देशमुख यांनी दिला. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय काँग्रेस पक्ष स्वस्थ बसणार नाही. हे काम करण्यासाठी नरेंद्र अथवा देवेंद्रची गरज लागणार नाही. काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस कार्यकर्ता इमाने इतबारे शेतकऱ्यांची सेवा करील. रस्त्यावरच्या लढाईला काँग्रेस पक्षाने लातुरातून प्रारंभ केला आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांना आणि सामान्य जनतेला सेवा दिल्या जात नाहीत, तोपर्यंत हा लढा सुरू राहील. यापेक्षा अधिक तीव्र पद्धतीने काँग्रेस पक्ष दुष्काळाच्या प्रश्नावर लढा उभा करेल, असेही आमदार अमित देशमुख म्हणाले.

Web Title: Congress's District Caucheryar Mahamarcha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.