काँग्रेसने रेल्वे रोखली !
By Admin | Updated: June 26, 2014 00:37 IST2014-06-26T00:33:14+5:302014-06-26T00:37:22+5:30
लातूर : मोदी सरकारने रेल्वेच्या प्रवास व मालवाहतुकीच्या दरात भरमसाठ वाढ केली आहे. याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने बुधवारी सकाळी लातूर रेल्वे स्टेशनवर रेलरोको आंदोलन केले.

काँग्रेसने रेल्वे रोखली !
लातूर : महिनाभरापूर्वीच सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने रेल्वेच्या प्रवास व मालवाहतुकीच्या दरात भरमसाठ वाढ केली आहे. याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने बुधवारी सकाळी लातूर रेल्वे स्टेशनवर रेलरोको आंदोलन केले.
लातूर रेल्वे स्टेशनवर बुधवारी सकाळी ९.३५ वाजता परळी-मिरज ही गाडी काँग्रेस कार्यकर्त्यांनी रोखून धरत केंद्र सरकार व रेल्वे दरवाढीच्या निर्णयाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करीत बराचवेळ हे आंदोलन केले. या आंदोलनात राज्य साक्षरता परिषदेचे अध्यक्ष अॅड. त्र्यंबकदास झंवर, जिल्हाध्यक्ष अॅड. व्यंकट बेद्रे, शहर जिल्हाध्यक्ष अॅड. समद पटेल, जि.प. अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, महापौर स्मिता खानापुरे, रेणा साखर कारखान्याचे चेअरमन यशवंत पाटील, विकास कारखान्याचे व्हा. चेअरमन विजय देशमुख, माजी जि.प. अध्यक्ष संतोष देशमुख, बाजार समितीचे सभापती विश्वंभर मुळे, मनपा गटनेते नरेंद्र अग्रवाल, महिला काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षा संगीता मोळवणे, पं.स. सभापती मंगलप्रभा घाडगे, माजी उपनगराध्यक्षा खाजाबानू बुऱ्हाण, नरेश पंड्या, किशनराव लोमटे, संभाजी सूळ, दगडू पडिले, सर्जेराव मोरे, भानुदास डोके, महेश घार, मदनराव भिसे, सोनू डगवाले, बालाजी सुरवसे, अंगद सूर्यवंशी, नबी नळेगावकर, रफिक सय्यद, सुनीता आरळीकर, स्वाती जाधव, रेखा शिखरे, जफर पटेल, बिभीषण सांगवीकर यांच्यासह काँग्रेस व विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
जनतेच्या प्रश्नांवर काँग्रेस आक्रमक होणार...
विविध आश्वासने देऊन सत्तेवर बसलेल्या मोदी सरकारने जनतेच्या हिताविरुद्ध निर्णय घेणे सुरू केले आहे. रेल्वे प्रवास दरवाढीवरून केंद्र सरकारचा खोटारडेपणा उघड झाला आहे. लवकरच गॅस आणि पेट्रोलच्याही दरात वाढ होण्याचे संकेत या सरकारने दिले आहेत.
यापूर्वीच्या काळात उठसूठ आरोप करणाऱ्या आता केंद्राच्या सत्तेत बसणाऱ्या लोकांचा दुटप्पीपणा स्पष्ट झाला आहे. जनभावना लक्षात घेऊन भविष्यात जनतेच्या प्रश्नावर काँग्रेस अधिक आक्रमकपणे रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष अॅड. व्यंकट बेद्रे म्हणाले.
दरवाढ मागे घ्या...
अच्छे दिन आयेंगे म्हणून केंद्राच्या सत्तेत बसलेल्या शासनाने काही दिवसांतच रेल्वेच्या दरात प्रचंड वाढ करून जनतेच्या खिशाला कात्री लावली आहे. ही दरवाढ पूर्णत: मागे घेण्यात यावी, अशी मागणी यावेळी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली.