काँग्रेसला आत्मविश्वास नडला !
By Admin | Updated: August 12, 2015 00:59 IST2015-08-12T00:53:08+5:302015-08-12T00:59:40+5:30
बालाजी थेटे , औराद शहाजानी औराद बाजार समितीची निवडणूक पहिल्यांदाच झाली असून, ३७ विविध कार्यकारी सोसायटीपैकी २२ सोसायट्यांवर काँग्रेसची सत्ता आहे़

काँग्रेसला आत्मविश्वास नडला !
बालाजी थेटे , औराद शहाजानी
औराद बाजार समितीची निवडणूक पहिल्यांदाच झाली असून, ३७ विविध कार्यकारी सोसायटीपैकी २२ सोसायट्यांवर काँग्रेसची सत्ता आहे़ मात्र भाजपाने अतिशय नियोजनबद्ध प्रचार करुन १४ पैकी ९ जागांवर विजय मिळविला आहे़ काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना आत्मविश्वास नडल्यामुळेच भाजपाने औराद बाजार समितीची निवडणुकीत वर्चस्व निर्माण केल्याचे बोलले जात आहे़
औराद बाजार समितीवर अनेकदा प्रशासक आलेले आहे़ मतदारांतून पहिल्यांदाच संचालक मंडळ आले आहे़ औराद बाजार पेठेत महाराष्ट्रासह शेजारील कर्नाटक राज्यातून शेतीमाल येतो़ बाजार पेठेची उलाढालही मोठी आहे़ ५८ गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या या बाजार समितीवर आपली सत्ता यावी म्हणून, भाजपा, काँग्रेस व शिवसेना या पक्षांनी निवडणूक प्रचाराची आखणी केली होती़ भाजपाचे आ़ संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे बंधू अरविंद पाटील यांनी औराद शेतकरी विकास पॅनलची धुरा सांभाळून औरादमध्येच ठाण मांडले होते़ अतिशय नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा हाताळून त्यांनी थेट मतदारांशी संवाद साधला़ आ़ संभाजी पाटील व माजी आ़ पाशा पटेल यांनीही औराद, अंबुलगा येथे मोठ्या सभा, बैठका घेऊन मतदारांना विकासासाठी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केले़ तर काँग्रेस पक्षाचे जि़प़चे माजी अध्यक्ष अशोकराव पाटील निलंगेकर यांनी डॉ़ शिवाजीराव पाटील निलंगेकर शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून प्रचार यंत्रणा राबविली़ काँग्रेसचे आ़ बस्वराज पाटील यांनीही औसा मतदार संघात प्रचार सभा घेतल्या़ शिवसेनेच्या वतीने लिंबन महाराज रेशमे, संपर्क प्रमुख संजय सावंत, जिल्हाध्यक्ष संतोष सोमवंशी, अभय साळुंके, पप्पू कुलकर्णी यांच्या उपस्थितीत प्रचार रॅली काढली़ औराद येथे मेळावाही घेतला़ पण फारसा प्रभाव शिवसेनेला दाखवता आला नाही़ एवढेच काय त्यांना व्यापारी मतदारसंघातून उमेदवारही भेटला नाही़ एकंदरीत सत्ता संघर्षाच्या या निवडणुकीत भाजपानेच आपले उमेदवार प्रथम क्रमांकाने निवडून आणले आहेत़ व्यापारी मतदार संघातून भाजपाचे दोन्हीही उमेदवार निवडून आले असून, अत्यंत कमी मताने काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले आहेत़ या मतदार संघावर काँग्रेसचे वर्चस्व आहे, असे म्हणत मतदारांनी भाजपाच्या पारड्यात मत दिले़ दिग्गजांचा निकाल अद्याप लागलेला नाही़ यात काँग्रेसचे मोहन भंडारे, समयोद्दीन देशमुख, भाजपाचे अजित माने, बस्वराज वलांडे या चौघांचे भवितव्य मतपेटीत बंद आहे़ न्यायालयाच्या निकालानंतर या मतदार संघाची मतमोजणी होणार आहे़