लोकसभा पराभवानंतर काँग्रेसमध्ये धुसफूस वाढली...

By Admin | Updated: May 28, 2014 00:22 IST2014-05-28T00:17:33+5:302014-05-28T00:22:59+5:30

दत्ता थोरे , लातूर लोकसभा निवडणुकीत लातूरमधून काँग्रेसच्या झालेल्या दारूण पराभवानंतर काँग्रेसमधील धुसफूस कमालीची वाढली आहे.

Congress blames Congress after losing Lok Sabha ... | लोकसभा पराभवानंतर काँग्रेसमध्ये धुसफूस वाढली...

लोकसभा पराभवानंतर काँग्रेसमध्ये धुसफूस वाढली...

दत्ता थोरे , लातूर लोकसभा निवडणुकीत लातूरमधून काँग्रेसच्या झालेल्या दारूण पराभवानंतर काँग्रेसमधील धुसफूस कमालीची वाढली आहे. वैयक्तिक हेवेदाव्यांनी स्वहिताची वळणे गाठल्याने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसची मोट बांधायची कशी ? हा प्रश्न कसलेले जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. व्यंकट बेद्रे यांच्यापुढे आहे. दुसरीकडे पक्षावर आणि कार्यकर्त्यांवर ‘टॉप टू बॉटम’ अंतिम मोहोर कुणाची राहील ? यावर पक्षात मतभेद असून हळूहळू ते चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. माजी आमदार शिवाजीराव कव्हेकरांनी देशमुखांच्या हक्काच्या दोन विधानसभा मतदारसंघापुरती बोलाविलेली आजची वैयक्तिक चिंतन बैठक शैलेश लाहोटी यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चेने काँग्रेसमध्ये कमालीची अस्वस्थतता पसरली आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाचा दोन लाख ५३ हजार इतक्या मोठ्या फरकाने दारूण पराभव झाला. या पराभवानंतर काँग्रेसचे नेते पराभवाची कारणमिमांशा शोधू लागले आहेत. परंतु यात सामूहिक शक्ती कुठेच दिसत नाही. शिवाजीराव कव्हेकरांनी चिंतनाच्या निमित्ताने लातूर शहर आणि लातूर ग्रामीण या दोनच मतदारसंघातील कारणांच्या शोधासाठी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांचा स्वतंत्र मेळावा बुधवारी स्वामी विवेकानंद शिक्षण संकुलात ठेवला आहे. एकिकडे आ. अमित देशमुख यांच्याकडून खासगीत महत्त्वाच्या एकेका कार्यकर्त्याला गढीवर बोलावून ‘वन टू वन’ चर्चा करीत कारणांचा शोध घेणे चालू असताना दुसरीकडे कव्हेकरांनी भरविलेला स्वतंत्र मेळावा असे दोन शोधमार्ग तयार झाले आहेत. जिल्हाध्यक्ष व्यंकट बेद्रे यांनी कव्हेकरांचा मेळावा अवैध ठरविला आहे. पक्षाची प्रदेश कार्यकारिणीने दोघांपैकी कुणाला अहवाल तयार करायला सांगितले की दोघांचे स्वतंत्र अहवाल घेणार याबाबत काँग्रेसचे कार्यकर्तेच बुचकळ्यात पडले आहेत. शिवाय कव्हेकरांनी दोनच विधानसभा मतदारसंघाबाबत चिंतनाची वेगळी चूल मांडल्याने जिल्ह्याच्या वर्तुळात वेगळ्याच चर्चा आहेत. त्यांनी उभारलेला हा सवतासुभा उद्याच्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्वत:च्या ताकदीची शक्तीपरिक्षा म्हणून पाहीली जात आहे. त्यांच्या या चिंतन बैठकीकडे देशमुखांच्या गढीचे कान चांगलेच टवकारले आहेत. कारण काँग्रेसला लोकसभा मतदारसंघातील सर्वच ठिकाणी पिछाडी मिळालेली आहे. जर चिंतनच करायचे तर ते सर्वच मतदारसंघाबाबत करायचे सोडून देशमुखांच्या ताब्यातील दोन विधानसभा मतदारसंघाबाबतच कव्हेकर सक्रीय झाल्याने चर्चेला ऊत आला आहे. दुसरीकडे पक्षाचे वरिष्ठ नेतेही आपापल्या परिने पराभवाची कारणे शोधित आहेत. येत्या दहा बारा दिवसात याबाबत पुन्हा जिल्हा कार्यकारीणीमध्ये चर्चा होणे अपेक्षित आहे. आता जिल्हाध्यक्ष पक्ष बांधणीची मोहीम कशा पध्दतीने हाताळणी करतात, याकडे कार्यकर्त्यांचे डोळे लागले आहेत. शैलेश लाहोटी यांच्या भाजप प्रवेशाच्या वावड्या... दुसरीकडे लातूर शहरात सर्वाधिक चर्चेला तोंड फोडले ते शैलेश लाहोटी या युवा नेत्याच्या भाजपा प्रवेशाच्या वावड्याने. लाहोटी यांनी या वृत्ताचा इन्कारही केला नाही. भविष्यात आपण स्वतंत्रपणे राजकारण करू अशा प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिल्या आहेत. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार आ. अमित देशमुख आणि शैलेश लाहोटी या दोघांमध्ये जम्बो चर्चा झाली. परंतु या चर्चेत दिलजमाई झाली नाही. उलट लाहोटी यांनी आपण विधानसभा निवडणुकीला ‘स्वतंत्र’ पणे सामोरे जाणार असल्याचे ठामपणे सांगितल्याचे अधिकृत सूत्राने सांगितले. त्यांनी पक्ष सोडण्याच्या भूमिकेवर आणि कव्हेकरांच्या स्वतंत्र मेळाव्यावर पक्षाने अद्याप कसलेही अधिकृत भूमिका घोषित केली नाही. ती करायची तर निर्णय कोणी घ्यायचा यावर पक्षात शिक्कामोर्तब होत नाही.

Web Title: Congress blames Congress after losing Lok Sabha ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.