आरोग्य सुविधांचा बृहत आराखडा होतोय तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:03 IST2021-08-22T04:03:57+5:302021-08-22T04:03:57+5:30
जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. सुधाकर शेळके ---- जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून सध्या आरोग्य संस्थेच्या स्थापनेचा बृहत आराखडा तयार करण्याचे ...

आरोग्य सुविधांचा बृहत आराखडा होतोय तयार
जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. सुधाकर शेळके
----
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून सध्या आरोग्य संस्थेच्या स्थापनेचा बृहत आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यातून लोकसंख्येवर आधारित प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रे केली जाणार आहेत. ३० हजार लोकसंख्येसाठी एक केंद्र असते. त्यानुसार बजाजनगर परिसरातील जाेगेश्वरी, एकलहरा येथेही प्राथमिक आरोग्य केंद्रे निर्माण होतील. राज्याचा एकत्रित आराखडा मंजूर होतो. त्यामुळे महिनाभरात आराखडा तयार केला जाईल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. सुधाकर शेळके ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले.
गेल्या १७ महिन्यांपासून ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा कोविडला सामोरे जात आहे. सध्या ग्रामीण भागातील वैजापूर आणि पैठण तालुका वगळता अन्य ठिकाणी कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. सध्या डेल्टा प्लस आणि तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे अधिकाधिक आरटीपीसीआर तपासण्या करण्यावर भर दिला जात आहे. डेल्टा प्लसच्या उपचारासंदर्भात डाॅक्टरांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. बालकांच्या उपचारांच्या दृष्टीने वैद्यकीय अधिकाऱ्यांना नवजात शिशूतज्ज्ञांकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रतिबंध आणि प्रथमोपचार सेवा देणे हे आमचे प्रमुख काम आहे, असे डाॅ. शेळके म्हणाले.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नाॅनकोविड रुग्णसेवा, लसीकरण आता सुरळीतपणे सुरू झाले आहे. कोरोनाकाळात प्राथमिक आरोग्य केंद्रांत बाळंतपणाचे प्रमाण कमी झाले. मात्र, आता प्राथमिक आरोग्य केंद्रात जास्तीत जास्त बाळंतपणे होतील, यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. क्षयरोग, गोवर, रुबेला आदी नियमित लसींचा मध्यंतरी तुटवडा होता. मात्र, आता लसींचा पुरवठा सुरळीत झाला आहे. वंचित राहिलेले लाभार्थी शोधून लसीकरण केले जात आहे. कुटुंब कल्याण शस्त्रक्रियाही सुरळीत झाल्या आहेत. रोज दोनशे ते तीनशे शस्त्रक्रिया आजघडीला होत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी ३८ रुग्णवाहिकांचा ताफा मिळाला आहे. यात १८ रुग्णवाहिका या आमदार निधीतील आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी तो संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी मास्क, सोशल डिस्टन्स यासह कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन केले पाहिजे, असे आवाहन डाॅ. सुधाकर शेळके यांनी केले.