सामाजिक परिवर्तनासाठी व्यापक लढा
By Admin | Updated: October 26, 2015 00:04 IST2015-10-25T23:30:53+5:302015-10-26T00:04:27+5:30
बीड : जिल्ह्यात माळी समाज मोठ्या प्रमाणात आहे. समाजाच्या चौफेर विकासासाठी अखिल भारतीय माळी महासंघ कटीबद्ध असून येणाऱ्या काळात

सामाजिक परिवर्तनासाठी व्यापक लढा
बीड : जिल्ह्यात माळी समाज मोठ्या प्रमाणात आहे. समाजाच्या चौफेर विकासासाठी अखिल भारतीय माळी महासंघ कटीबद्ध असून येणाऱ्या काळात शिष्यवृत्तीसह बेराजगार व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलने केली जाणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष किशोर राऊत यांनी दिली. ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी संघटनेच्या माध्यमातून सुरु असलेल्या कार्याचा लेखाजोखा मांडला.
२००३ पासून समाजकार्यात सक्रिय असलेले किशोर राऊत ज्येष्ठ सामाजिक नेत्या प्रा. सुशीला मोराळे यांच्या संस्थेत शिक्षक आहेत. भाजीपाला पिकवून गुजराण करणाऱ्या कुटुंबातून पुढे आलेल्या किशोर राऊत यांनी माळी महासंघाच्या माध्यमातून संघटन उभे केले आहे. ते म्हणाले, महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे केलेली शिफारस ही मोठी उपलब्धी आहे. केंद्र सरकारने याकडे सकारात्मक दृष्टीने पहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. फुले दाम्पत्यास भारतरत्न जाहीर करण्याच्या मागणीसाठी माळी महासंघाने आंदोलने केलेली आहेत. १ जानेवारी रोजी पुणे येथील भिडे वाड्यात पहिली शाळा उघडण्यात आली होती. त्यामुळे १ जानेवारी हा दिवस फुले दाम्पत्य सन्मान दिन म्हणून साजरा व्हावा अशी मागणी संघटनेने लावून धरली आहे. संघटनेची अहमदाबादेत ५०० एकर जमीन आहे. तेथे भव्य शैक्षणिक संकूल उभारण्यात येणार आहे. बेरोजगारांचे हित लक्षात घेऊन पुणे, नागपूर येथे संघटनेने मेळावा, उद्योजकता शिबीर घेतले होते. बीडमध्ये देखील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले. समाजातील बेरोजगारी दूर करण्यासाठी शक्य ते प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. संघटनेने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करुन त्यांना प्रोत्साहन दिलेले आहे. कापसाला हमीभाव व फू्रट मार्केटमध्ये शेतकऱ्यांना हक्काचे गाळे मिळावेत या मागण्यांसाठी आंदोलने केलेली आहेत. १२ शेतकऱ्यांना गाळे मिळवून देण्यात यशही आले आहे. राष्ट्रीय अध्यक्ष संभाजी पगारे, राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश ठाकरे, प्रदेशाध्यक्ष शंकरराव लिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यात संघटन बांधणी आणखी मजबूत करायची आहे. महापुरुषांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी तालुकानिहाय प्रशिक्षण घेतले जाईल, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)