बिहारमधील औरंगाबादच्या तक्रारी महानगरपालिकेच्या अॅपवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 00:22 IST2017-11-24T00:22:01+5:302017-11-24T00:22:05+5:30
स्वच्छ भारत अभियानांतर्गत साफसफाईच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या स्वच्छता अॅपवर नऊ तक्रारी बिहार राज्यातील औरंगाबाद शहराच्या आल्याची माहिती समोर आली आहे. औरंगाबाद महाराष्ट्रातील असो किंवा बिहारमधील स्वच्छतेच्या तक्रारी सारख्याच असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.

बिहारमधील औरंगाबादच्या तक्रारी महानगरपालिकेच्या अॅपवर
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : स्वच्छ भारत अभियानांतर्गत साफसफाईच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या स्वच्छता अॅपवर नऊ तक्रारी बिहार राज्यातील औरंगाबाद शहराच्या आल्याची माहिती समोर आली आहे. औरंगाबाद महाराष्ट्रातील असो किंवा बिहारमधील स्वच्छतेच्या तक्रारी सारख्याच असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र शासनाने देशातील चार हजार ४४ शहरांसाठी अॅप तयार केले आहे. या अॅपवर नागरिकांनी अस्वच्छतेच्या तक्रारी केल्यानंतर संबंधित मनपा, नगरपालिकांनी तीन-चार दिवसांत तक्रारींचा निपटारा करणे बंधनकारक आहे. महापालिकेने दोन दिवसांपूर्वी मोबाइलवर अॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन नागरिकांना केल्यानंतर तक्रारी येण्यास सुरुवात झाली आहे.
विविध प्रकारच्या ४० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यातील नऊ तक्रारी बिहार राज्यातील औरंगाबाद शहराच्या असून, त्या डिलिट करण्यात आल्या आहेत.
नागरिकांनी तक्रार केल्यानंतर अॅपवर अपलोड केलेला अस्वच्छतेचा फोटो पाहून महापालिकेचा स्वच्छता निरीक्षक त्या भागात जाऊन सफाई करतो व स्वच्छ झालेल्या जागेचा फोटो अपलोड करतो. हा फोटो संबंधित तक्रारदारापर्यंत जातो, असे अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी सांगितले.