अडीच लाख हेक्टर्सवरील पिकांवर कुळव
By Admin | Updated: August 12, 2015 01:00 IST2015-08-12T00:54:10+5:302015-08-12T01:00:01+5:30
लातूर : लातूर जिल्ह्यात ७ ते १७ जून या कालावधीत सरासरी ८३ मि.मी. पाऊस झाला़ या पावसावरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणी केली असून,

अडीच लाख हेक्टर्सवरील पिकांवर कुळव
लातूर : लातूर जिल्ह्यात ७ ते १७ जून या कालावधीत सरासरी ८३ मि.मी. पाऊस झाला़ या पावसावरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणी केली असून, त्यानंतर पावसाने ताण दिल्यामुळे पिके करपून गेली आहेत़ ५ लाख ५६ हजार ८६० हेक्टर्सपैकी ३ लाख ५८ हजार ५१५ हेक्टर्सवर पेरणी झाली़ त्यातील २ लाख ५० हजार हेक्टर्सवर कुळव फिरवला आहे़ तसेच जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्पही कोरडेठाक पडले आहेत़ त्यामुळे जिल्ह्यात असलेल्या ६ लाख १५० पशुधनाच्या चारा, पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़ उडीद, मुगाचा पेरा वाया गेला असून, २ लाख ५० हजार हेक्टर्सपैकी १ लाख ४७ हजार हेक्टर्सवरील सोयाबीन मोडीत निघाले आहे़ या पिकावर शेतकऱ्यांनी नांगर फिरवला आहे़ गेल्या तीन वर्षांपासून ही स्थिती असल्याने शेतकऱ्यांचे पार कंबरडे मोडले आहे़ दरम्यान, केंद्राचे दुष्काळी पथक लातुरात पाहणी करण्यासाठी आले असून, या पथकाला तीन-चार गावांचा शिवार पाहून दुष्काळाची दाहकता समजणार आहे का, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे़
लातूर जिल्ह्यात ५ लाख ५६ हजार ८६० हेक्टर्स खरीपाचे क्षेत्र आहे. यापैकी ३ लाख ५८ हजार ५१५ हेक्टर्सवर पेरणी झाली आहे. या पेरण्यांचे प्रमाण ६४.४ टक्के आहे. सर्वाधिक सोयाबीनचा पेरा २ लाख ३६ हजार ९८७ हेक्टर्सवर झाला आहे. मात्र गेल्या पाच आठवड्यांपासून पाऊस झाला नाही. मृग नक्षत्र वगळता नंतर पाऊसच नाही. पावसाअभावी पिके करपली आहेत. चांगल्या जमिनीवरील पिकांनी तग धरली होती. परंतु, पावसाचा पत्ताच नाही. त्यामुळे ती पिकेही करपली आहेत. त्यामुळे पिके मोडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामध्ये सोयाबीन-१ लाख ४७ हजार, तूर-४०३१, सूर्यफुल-२०००, मका-३८०, बाजरी-२०० आदी १ लाख ५० हजार हेक्टर्सवरील पिके मोडीत काढली आहेत. लातूर तालुक्यात सोयाबीन १९०२, तूर २०१०, औसा तालुक्यात तूर ७००, सूर्यफुल ७००, मका ३८०, बाजारी २००, निलंगा तालुक्यात सोयाबीन ३०००, तूर ३२७, शिरूर अनंतपाळ तालुक्यात सोयाबीन २२५०, रेणापूर तालुक्यात ३२५०, तूर ४५०, चाकूर तालुक्यात सोयाबीन ९५००, तूर २६६४ असे एकूण जिल्ह्यात २ लाख ५० हजार हेक्टर्सवरील पिके मोडीत काढली आहेत. यामुळे शेतकरी कोलमडला असून, त्याला शासनाच्या मदतीची गरज आहे़