चिकलठाण्यात विजेअभावी ४८ तास यंत्रे बंद

By Admin | Updated: June 12, 2014 01:35 IST2014-06-12T01:26:51+5:302014-06-12T01:35:25+5:30

साहेबराव हिवराळे , औरंगाबाद वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रात ४८ तास वीजपुरवठा खंडित झाला व २०० कारखान्यांची यंत्रे बंद राहिल्याने ६० ते ६५ कोटी रुपयांचे नुकसान झाले

Closed machines for 48 hours without power to burn | चिकलठाण्यात विजेअभावी ४८ तास यंत्रे बंद

चिकलठाण्यात विजेअभावी ४८ तास यंत्रे बंद

साहेबराव हिवराळे , औरंगाबाद
सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रात ४८ तास वीजपुरवठा खंडित झाला व २०० कारखान्यांची यंत्रे बंद राहिल्याने ६० ते ६५ कोटी रुपयांचे नुकसान झाले. ८०० कामगारांचा रोजगार बुडाला.
९ जून रोजी २५ खांब व ट्रान्सफॉर्मरवर झाडे पडून वीजपुरवठा खंडित झाला. तो पूर्ववत होण्यासाठी जीटीएलच्या कर्मचाऱ्यांना ४८ तास लागले. एन-१ सिडको, सेन्ट्रॉन, एलोरा, रेडियन्ट अ‍ॅग्रो, इंडियन टूल्स, ग्रिव्हज, इंडस्ट्रीयल १-२ फिडर अशा ९ फिडरवरील वीजपुरवठा पावसाने तोडला. उद्योजकांनी सतत फ्यूज कॉल सेंटरवर संपर्क साधून वीजपुरवठा कधी सुरू होणार, अशी विचारणा केली. मात्र, अर्धा तास, दोन तास, तासभर लागेल, असे सांगून ४८ तास झाले. अखेर उद्योजकांत बुधवारी संताप व्यक्त झाल्यामुळे जीटीएलची सुस्त यंत्रणा झपाटून कामाला लागली. जीटीएलने आधुनिक साधने न वापरता कुऱ्हाडीने झाडाच्या फांद्या तोडण्याचे काम केले. एकाने सांगितले की, झाड तोडण्याचा अधिकार आम्हाला नाही. मात्र, वीजपुरवठ्यास अडसर ठरत असतील त्या झाडांच्या फांद्या कापण्याचे काम पावसाळ्यापूर्वी न केल्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील वीज ४८ तास गायब होती. जीटीएलच्या प्रॉपर्टीचेही या पावसाने मोठे नुकसान केले. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे जीटीएलचे पितळ उघडे आहे.
जीटीएलच्या अधिकाऱ्यांनी मदत यंत्रणेत वाढ करून सायंकाळपर्यंत वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्याचे आश्वासन दिल्यानंतर उद्योजकांनी सायंकाळपर्यंत वीजपुरवठा सुरू होण्याची वाट बघितली. बुधवारी सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत होताच बहुतांश कारखान्यांत रात्रपाळीचे कामगार कामावर रुजू झाले.
दोन दिवसांत काल ९ पैकी ७ फिडर सुरू केले होते, तर रेडियंट आणि ग्रिव्हज फिडरचे काम सुरू होते, उशिरापर्यंत जे-सेक्टर आणि एच-सेक्टरच्या परिसरातील विजेचा बिघाड दुरुस्तीचे काम सुरू होते. जीटीएलच्या या कारभाराचा उद्योजकांसह सर्वसामान्यांना फटका बसला.
संयमाचा बांध फुटला
२०० कारखान्यांतील यंत्रे ४८ तास बंद ठेवावी लागल्यामुळे जवळपास ८०० कामगारांचा रोजगार बुडाला. त्यामुळे उद्योजकांनाही नुकसान सहन करावे लागले.
उद्योजकांच्या संयमाचा बुधवारी बांध फुटला आणि मासिआचे अध्यक्ष भारत मोतिंगे, राहुल मोगले, फुलचंद जैन,अर्जुन गायके, संतोष चौधरी, किशोर राठी, किरण जगताप, सचिन गायके आदींनी जीटीएलच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला. सायंकाळपर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नाही तर कार्यालयासमोर निदर्शने करण्याचा इशारा त्यांनी दिला.
उत्पादनात पडला खंड
जीटीएलच्या अधिकाऱ्यांशी सतत संपर्क साधून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी ४८ तास लागले. उत्पादनात खंड पडल्याचा व कामगारांच्या वेतनाचा भुर्दंड सहन करावा लागला, असे मासिआचे अध्यक्ष भारत मोतिंगे म्हणाले.
यंत्रणाच कुचकामी
यंत्रणाच कुचकामी ठरल्यामुळे उद्योजक वेठीस धरले गेले. आॅर्डर लांबल्यामुळे मनस्ताप झाला तो वेगळा, असे मासिआचे माजी अध्यक्ष अर्जुन गायके म्हणाले.
जीटीएलने तत्पर असावे
- उद्योग क्षेत्रातूनच जीटीएलला सर्वांत जास्त महसूल दिला जातो. उद्योजकांची बिलेही शक्यतो थकत नाहीत, असे असताना जीटीएलने अतिशय तत्परतेने सेवा दिली पाहिजे, असे उद्योजक फुलचंद जैन म्हणाले.
अकुशल यंत्रणेची मदत
- अधिकाऱ्यांनीच आधुनिक यंत्रणेचा वापर न करता अकुशल यंत्रणेच्या मदतीने वीजपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केल्यामुळे उद्योजकांना ४८ तासांचा फटका बसला, असे संतोष चौधरी यांनी सांगितले.
सतत प्रयत्न सुरू ठेवले
नैसर्गिक आपत्तीने ९ फिडरवरील वीजपुरवठा खंडित झाला. २० ते २५ खांब झाडे पडून जमिनीवर पडली. त्यामुळे सर्व्हिस वायर तुटल्या. मोठे आर्थिक नुकसान झाले. यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी उशीर झाला; परंतु त्यासाठी सतत प्रयत्न सुरू ठेवले. अखेर ४८ तासांनी वीजपुरवठा नियमित झाला आहे. उर्वरित किरकोळ कामे करण्यात येणार असल्याचे जीटीएलचे संपर्क अधिकारी समीर पाठक यांनी नमूद केले.

Web Title: Closed machines for 48 hours without power to burn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.