वैजापुरातील बांधकामे बंद करा
By Admin | Updated: July 6, 2014 00:34 IST2014-07-06T00:21:01+5:302014-07-06T00:34:54+5:30
वैजापूर : वैजापूर शहरासह तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून सध्या घोयगाव साठवण तलावात वैजापूर शहरास साधारणत: महिनाभर पुरेल इतकाच जलसाठा शिल्लक आहे.

वैजापुरातील बांधकामे बंद करा
वैजापूर : वैजापूर शहरासह तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून सध्या घोयगाव साठवण तलावात वैजापूर शहरास साधारणत: महिनाभर पुरेल इतकाच जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शहरातील सुरू असलेली सर्व बांधकामे तात्काळ बंद करण्याचे आदेश आपण महसूल व नगरपालिक ा प्रशासनाला दिले असल्याची माहिती शनिवारी जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी वैजापूर येथे दिली.
जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी शनिवारी वैजापूर येथे भेट देऊन शहर व तालुक्यातील पाणीटंचाई, मग्रारोहयो व अवैध वाळू उपशासंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, जुलै महिन्याचा पहिला आठवडा उलटून गेला तरी जिल्ह्यात अपवाद वगळता क ोठेही पाऊस न पडल्यामुळे पाणीटंचाईने रौद्र रूप धारण केले आहे. जायकवाडी धरणात केवळ ३ टक्के जिवंत जलसाठा शिल्लक असून येथून औरंगाबाद शहरासह पैठण व गंगापूरसाठी १८० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. जायकवाडी धरणातही हा अल्पसाठा येत्या काही दिवसांत संपणार असल्यामुळे पाणीटंचाईची झळ औरंगाबाद शहरासही बसणार आहे. त्या दृष्टीने पाणीटंचाईवर मात कशी करावी, याचा विचार प्रशासन करीत आहे. वैजापूर शहरास नाशिक जिल्ह्यातून पाणीपुरवठा होतो. नाशिक शहराची वाढती लोकसंख्या व कमी पर्जन्यमानामुळे नाशिक जिल्ह्यातच पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे विशेषत: याचा फटका वैजापूरवासीयांनाही बसणार आहे.
बांधकाम रोखण्यासाठी संयुक्त पथके
पाणीटंचाईचे सावट लक्षात घेता वैजापूर शहरात सुरू असलेली सर्व बांधकामे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या बांधकामांना लगाम घालण्यासाठी महसूल, पोलीस व नगरपालिका अशी संयुक्त पथकांची स्थापना करण्यात आली आहे. सध्या शहरास ४ दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असून यात आणखी पाणी कपातीचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. याशिवाय मग्रारोहयोंतर्गत सुरू असलेल्या कामाचा आढावाही त्यांनी घेतला. सध्या तालुक्यात विविध यंत्रणेमार्फत २१६ कामे सुरू असून या कामांवर ३३०० मजुरांची उपस्थिती आहे. मग्रारोहयाच्या कामाची तालुक्यात मोठ्या प्रमाणात मजुरांकडून मागणी असून मजुरांसाठी प्रशासनाकडून जास्तीत जास्त अकुशल कामे उपलब्ध करून दिली जातील. खाजगी विहिरींची प्रलंबित देयके देण्याचा आदेश संबंधितांना देण्यात आला आहे, तसेच तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीचा प्रस्ताव माझ्याकडे प्राप्त झाला असून हा प्रस्ताव तपासून लवकरच कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले. (वार्ताहर)
‘मी कलेक्टर बोलतोय, कॉल लवकर रिसिव्ह करीत जा’
जिल्हास्तरावर स्थापन केलेला टंचाई नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक विक्रम कुमार यांनी पत्रकारांना दिल्यानंतर त्यांनी या क्रमांकावर कॉल करा, असे पत्रकारांना सांगितले. त्यानंतर काही पत्रकारांनी या क्रमांकावर कॉल करण्याचा प्रयत्न केला; परंतु या क्रमांकावर रिंग गेली नाही, त्यामुळे दस्तुरखुद्द विक्रम कुमार यांनीच या क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु पहिल्या प्रयत्नात नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांनी कॉल रिसिव्ह केला नाही, त्यामुळे त्यांनी दुसऱ्यांदा प्रयत्न केला तेव्हा कॉल रिसिव्ह झाल्यानंतर ‘मी कलेक्टर बोलतोय, कॉल लवकर रिसिव्ह करीत जा’ असे फर्मान सोडताच संबंधित कर्मचाऱ्याची मात्र चांगलीच पाचावर धारण बसली. पहिल्या प्रयत्नात फोन रिसिव्ह न झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनाच प्रतीक्षा करावी लागली. सरकारी बाबूंच्या या कामचुकारपणाची प्रचीती विक्रम कुमार यांनाही आज आली.
वैजापूरसाठी महिनाभर पुरेल एवढेच पाणी शिल्लक
वैजापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घोयगाव साठवण तलावात सध्या शहरास ३० दिवस पुरेल एवढाच जलसाठा शिल्लक आहे. शहरात ८४ विंधन विहिरी असून यापैकी फक्त ३३ विंधन विहिरी चालू स्थितीत आहेत. उद्भवलेली पाणीटंचाई पाहता शहरवासीयांना या विंधन विहिरीद्वारे पाणीपुरवठा करण्याची तयारी आमची सुरू आहे, असे विक्रम कुमार म्हणाले.
महसूल व पोलीस कर्मचाऱ्यांच्या वाळू वाहनांवर कारवाई
याशिवाय स्थानिक महसूल यंत्रणेतील अधिकाऱ्यांचे नातेवाईक व पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांची चौकशी करून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी दिले.
त्या महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांची उचलबांगडी करणार
स्थानिक महसूल प्रशासनातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तक्रारी वाढल्या असून त्यांची उचलबांगडी करण्याची कारवाई लवकरच करण्यात येईल. जिल्हास्तरावर टंचाई नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली असून त्यासाठी नागरिकांनी १०७७ व २३३१०७७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे सांगून नागरिकांनी पाण्याचा कमीत कमी वापर करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन विक्रम कुमार यांनी केले. या बैठकीस आ. आर. एम. वाणी, माजी नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी, उपविभागीय अधिकारी नारायण उबाळे, तहसीलदार डॉ.प्रशांत पडघन, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, मुख्याधिकारी बी.यु. बिघोत यांची प्रमुख उपस्थिती होती.
अवैध वाळू उपशाबाबत धडक मोहीम हाती घेणार
तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाबाबत धडक मोहीम हाती घेण्यात येणार असून अवैध वाहनांचे परवाने निलंबित के ले जाणार आहेत, त्यामुळे वाळू चोरीला चाप बसेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.