शहर बसविना सातारा
By Admin | Updated: July 9, 2014 00:52 IST2014-07-09T00:24:25+5:302014-07-09T00:52:11+5:30
सातारा : देवळाई परिसरात वाहतुकीची गैरसोय असल्याने विद्यार्थी, शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना खाजगी वाहनातून आर्थिक झळ सहन करीत प्रवास करावा लागतो.

शहर बसविना सातारा
सातारा : देवळाई परिसरात वाहतुकीची गैरसोय असल्याने विद्यार्थी, शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना खाजगी वाहनातून आर्थिक झळ सहन करीत प्रवास करावा लागतो.
देवळाई- सातारा नगर परिषद विकास कृती समितीच्या वतीने एसटी महामंडळाकडे शहर बससेवा सुरू करण्याचे मागणीपत्र देऊनही अद्याप कारवाई झालेली नाही.
जास्तीच्या शहर बस सोडण्यात आल्या आहेत; पण सातारा- देवळाईसाठीच दुजाभाव का, असा नागरिकांचा प्रश्न आहे.
औरंगाबादच्या दक्षिणेला झपाट्याने वाढणारे सातारा- देवळाई शहर ओळखले जाते. टोलेजंग इमारतीने मुंबई, पुण्याला लाजवील असे चित्र वरवरचे दिसत असले तरी पाणी, रस्ते, वीजपुरवठ्यासह दळणवळणाची व्यवस्था अत्यंत वाईट आहे. पेन्शनर्सला शहरात जायचे असल्यास खिशात १०० ते २०० रुपयेच ठेवावे लागतात. रिक्षात प्रवासी कोंबले जातात. असा प्रवास करणे धोक्याचे असले तरी विद्यार्थी, वयोवृद्ध आणि कर्मचाऱ्यांना तो टळत नाही.
मनपाच्या शहर बसची सेवा साताऱ्यातून औरंगपुरा, रेल्वेस्टेशन, शहागंज अशी होती. त्यामुळे प्रवाशांची अडचण दूर झाली होती. आता मात्र शहर बससेवेने सातारा आणि देवळाई परिसरातील नागरिकांकडे दुर्लक्ष केल्याची खंत आहे.
मुलांसाठी पालकांची धावपळ
बीड बायपासहून वाहन चालविणे खूपच जोखमीचे बनले आहे. कॉलेजला शहरात जाणाऱ्या विद्यार्थ्याला दुचाकी देणे धोकादायक आहे. त्यामुळे रिक्षाच्या भाड्याचा भुर्दंड सहन करावा लागतो, असे हरिभाऊ राठोड यांनी सांगितले.
रास्ता रोको करणार
सातारा- देवळाई भागात शहर बस सुरू करण्याकडे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने नागरिक व वयोवृद्धांची गैरसोय होत आहे. एसटी महामंडळाच्या कार्यालयासमोर नाइलाजास्तव रास्ता रोको आंदोलन करावे लागेल, असा इशारा जमील पटेल यांनी दिला.
महिलांची गैरसोय
शहर व परिसरात नोकरीला जाणाऱ्या महिलांना प्रचंड रहदारीच्या रस्त्याने वाहने चालवावी लागतात. या रस्त्यावर सतत अपघातांचे सत्र असल्याने शहर बस सुरू करून गैरसोय टाळावी, अशी मागणी पद्मा वायकोस यांनी केली आहे.
विकासात अडचण
परिसरात शाळा, महाविद्यालय, दवाखाने असल्याने विकासाकडे वाटचाल असल्याचे दिसते. मात्र, दळणवळणाचे साधनच नसल्याने मोठी अडचण झाली आहे. खाजगी वाहनचालक प्रवाशांसोबत असभ्य वर्तन करतात, असे दिनेश राठोड म्हणाले.