हिंगोलीतील रस्त्यांना नागरिक वैतागले
By Admin | Updated: May 25, 2014 01:14 IST2014-05-25T00:44:01+5:302014-05-25T01:14:03+5:30
हिंगोली : शहरातील विविध भागांमधील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून, या रस्त्यांमधील खड्ड्यामुळे मान, पाठ, कंबरदुखीचे रूग्ण वाढले आहेत.
हिंगोलीतील रस्त्यांना नागरिक वैतागले
हिंगोली : शहरातील विविध भागांमधील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून, या रस्त्यांमधील खड्ड्यामुळे मान, पाठ, कंबरदुखीचे रूग्ण वाढले आहेत. रस्त्यातील खड्डे चुकविताना किरकोळ अपघाताच्या घटना घडत आहेत. या रस्त्यांच्या दयनीय अवस्थेमुळे शहरातील नागरिक चांगलेच वैतागले आहेत. हिंगोली शहराची झपाट्याने वाढ होत आहे. त्या तुलनेत नागरी सुविधांची स्थिती शहरात समाधानकारक नाही. शहरातील बहुतांश रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने या रस्त्यावरून चालताना नागरिकांच्या नाकीनऊ येत आहेत. हिंगोली शहरातील अग्रसेन चौक ते शासकीय विश्रामगृह या दरम्यानच्या रस्त्याचे काम गेल्या ३ वर्षांपासून सुरू आहे. जवळपास १ कि.मी. असलेल्या या रस्त्याचे काम तब्बल ४ कंत्राटदारांना राजकीय दबावातून देण्यात आले. सद्य:स्थितीत फक्त एकाच कंत्राटदाराने अग्रसेन चौक ते इंदिरा चौक या दरम्यानच्या रस्त्याचे काम पूर्ण केले. उर्वरित तिन्ही कंत्राटदारांनी हे काम सोडून दिले आहे. त्यामुळे आता सार्वजनिक बांधकाम विभागाला इतर छोट्या कंत्राटदारांना हे काम द्यावे लागत आहे. छोट्या कंत्राटदाराकडे पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याने कामाला वेग नाही. परिणामी गेल्या तीन वर्षांपासून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या मुख्य रस्त्यामुळे नागरिकांची मोठी अडचण होत असली तरी याबाबतचा जाब संबंधित यंत्रणेला व ज्यांनी राजकीय दबाव टाकून ४ कंत्राटदारांना काम देण्यास अधिकार्यांना भाग पाडले, अशा राजकीय नेत्यांना कुणीही विचारण्यास तयार नाही. परिणामी आणखी वर्षभर तरी या रस्त्याचे काम पूर्ण होणार नाही, असे उपहासाने म्हटले जात आहे. या रस्त्याच्या कामाला दिरंगाई होत असताना जिल्हाधिकारीही याकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. रस्त्यावरील खड्डे पाहून जिल्हाधिकार्यांनी त्यांच्या साई नगर भागातील निवासस्थानापासून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणार्या रस्त्याचा मार्गच बदलला. पूर्वी जिल्हाधिकारी इंदिरा चौकातून बसस्थानक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कारने जात होते. आता शिवाजीनगर भागातून थेट जुन्या जिल्हा परिषद इमारतीपासून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ते जात आहेत. या रस्त्याच्या दयनीय अवस्थेबद्दल १५ आॅगस्ट रोजी घेतलेल्या बैठकीत पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अविनाश धोंडगे यांना धारेवर धरले होते; परंतु धोंडगे यांनीही संबंधित कंत्राटदाराकडून गतीने काम होत नसल्याचे सांगितले. तसेच खासगीमध्ये हे काम ४ कंत्राटदारांना देण्यासाठी कसा दबाव आला, याचेही वर्णन केले. त्यावेळी पालकमंत्र्यांनी नोव्हेंबरपर्यंत हे काम पूर्ण करा, असे आदेश दिले होते. नोव्हेंबर उलटून आता सहा महिने झाले तरी काम पूर्ण झाले नाही. शिवाय पालकमंत्र्यांनाही पुन्हा या कामाकडे पाहण्यास वेळ मिळाला नाही. परिणामी शहरातील नागरिकांची गैरसोय सुरूच आहे. याशिवाय शहरातील जिल्हा परिषद अधिकारी निवासस्थानासमोरील रस्त्यांची वाईट अवस्था झाली आहे. हा रस्ता जड वाहनांमुळे खचला आहे. नांदेड नाका ते रामाकृष्णा हॉटेलदरम्यान या रस्त्याचे काम अद्यापही पूर्ण करण्यात आलेले नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागील रस्त्याची अवस्थाही वाईट आहे. शिवाजीनगर भागातील बँक आॅफ महाराष्टÑच्या कॉर्नर रस्त्यापासून फलटन भागातील पाण्याच्या टाकीपर्यंतच्या रस्त्याचे कामही मंदगतीने सुरू आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खडी टाकण्यात आली आहे. शासकीय विश्रामगृह ते तहसील कार्यालयापर्यंतच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पुढे रेल्वे उड्डाणपूल ते जिल्हा रूग्णालय दरम्यानच्या रस्त्याचीही वाईट अवस्था झालेली आहे. शहरातील बुलडाणा अर्बन बँक ते आरडब्ल्यू हॉटेल हा रस्ता गेल्या कित्येक वर्षांपासून वाईट अवस्थेत आहे. पालिकेतील राजकीय वादातून या रस्त्याची दुरूस्तीच करण्यात आलेली नाही. सिद्धार्थनगर भागातून जवळा-पळशी रोडकडे जाणार्या रस्त्याचेही काम अर्धवटच आहे. अकोला रोडकडून आदर्श महाविद्यालयाकडे तसेच अंतुलेनगरकडून जिजामातानगर भागाकडे जाणार्या रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. जिजामाता नगर भागातील काही अंतर्गत रस्त्यांचीही दयनीय अवस्था झालेली आहे. जुन्या शहरातील ग्रामीण पोलिस स्टेशन रोड, गांधी चौक ते इंदिरा चौक, कपडा गल्ली, हरण चौक, बावनखोली, मंगळवारा रोड, गवळीपुरा, तलाबकट्टा, सिद्धार्थ कॉलनी, आरामशीन रोड, आंबिका टॉकीज रोड आदी भागातील रस्त्यांचीही वाईट अवस्था झाली आहे. काही भागातील रस्ते चांगले होते; परंतु नगरपालिकेच्या वतीने अतिक्रमणाला कसलेही हात न लावता रस्ते फोडून पाईपलाईन टाकण्यात आली. परिणामी या रस्त्यावरून चालनेही कठीण झाले आहे. यातील बहुतांश रस्ते नगर पालिकेच्या अखत्यारित येतात. तर काही रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतात. शहरातील रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल संबंधितांना जाब विचारण्याची तसदी मात्र कोणीही घेत नाही, ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल. (जिल्हा प्रतिनिधी) शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने या खड्ड्यांमुळे मान, पाठ व कंबरदुखीचे दुखणे मोठ्या प्र्रमाणात वाढले आहे. खड्ड्यांमुळे मणक्यामधील कुर्चा (गादीचा थर) कमी होत असल्यामुळे हाडांची झीज होत आहे. त्यामुळे वाहनधारकांना दवाखान्याचा रस्ता धरावा लागत आहे.