आधार नोंदणीकडे नागरिकांची पाठ
By Admin | Updated: June 17, 2014 01:13 IST2014-06-17T00:33:53+5:302014-06-17T01:13:16+5:30
उस्मानाबाद : शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड असणे आवश्यक आहे.

आधार नोंदणीकडे नागरिकांची पाठ
उस्मानाबाद : शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड असणे आवश्यक आहे. या अनुषंगाने प्रशासनाच्या वतीने विविध ठिकाणी आधार कार्ड नोंदणीची सोय केली आहे. परंतु, जिल्ह्यात पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात ११ लाख ९७ हजार ४० जणांनी आधार कार्डची नोंदणी केली असली तरी पाच लाख नागरिकांनी अद्याप याकडे फारसे गांभिर्याने पाहिल्याचे दिसत नाही.
बँकेमध्ये खाते उघडायचे असो अथवा शासकीय सवलती घ्यायच्या असो. प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच बँक खाते काढण्यासाठीही आधार कार्ड गाह्य धरण्यात येत आहे. त्यामुळे शासनाच्या वतीने मागील तीन वर्षापासून आधार कार्ड नोंदणी करण्यात येत आहे. प्रारंभी या नोंदणीस शहरी व ग्रामीण भागातून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, गॅस सिलेंडर, रॉकेल अनुदान व इतर शासकीय योजना यासाठी नागरिकांना या कार्डची गरज भासत असल्याने नागरिकांनी नोंदणी करण्यास सुरूवात केली.
जिल्ह्यात आधार कार्डसाठी पहिल्या टप्प्यात ४ लाख ६३ हजार ९९ तर दुसऱ्या टप्प्यात ७ लाख ३६ हजार ९७१ जणांनी नोंदणी केली. सध्या विविध तीन कंपन्यामार्फत ३९ किट्सच्या मदतीने नोंदणीचे काम सुरु आहे. आतापर्यंत पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात मिळून ११ लाख ९७ हजार ४० जणांनी आधार कार्डची नोंदणी केली असून, अद्यापही जिल्ह्यातील पाच लाख २ हजार २८२ जणांची नोंदणी होणे बाकी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
तालुकानिहाय झालेली आधार नोंदणी अशी
तालुकानोंदणी संख्या
उमरगा२५१२९४
उस्मानाबाद२४३९८०
तुळजापूर२०१७३१
कळंब१५९९८६
परंडा९४०१६
भूम९१०५०
लोहारा८४३७४
वाशी७०६०९