छत्रपती संभाजीनगर : राजनगर मुकूंदनगर रेल्वे रुळावरून ये- जा करण्यासाठी एक छोटासा मार्ग आहे. तो रेल्वे प्रशासनाने बंद करण्याचा निर्णय घेतल्याने संतप्त राजनगर, मुकूंदनगर येथील नागरिकांनी रेल्वे रुळावर येत मालगाडी रोखली. या प्रकाराने परिसरात जवळपास अर्धा तास तणावाची स्थिती होती.
रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग पोलीस आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. येथे भुयारी मार्गाचे काम पूर्ण करा, नंतरच हा मार्ग बंद करा, अशी मागणी नागरिकांनी केली. यावेळी सुमारे अर्धा तास रेल्वे रोखून ठेवण्यात आली.
नागरिक विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन रेल्वे रोको करून प्रशासनाचा जाहीर निषेध केला. जोपर्यंत भुयारी मार्गाचे काम सुरू होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन कायमस्वरूपी चालू राहील, असा इशारा नागरिकांनी दिला.