यशस्वी होण्यासाठी योग्य करिअर निवडावे
By Admin | Updated: December 20, 2015 23:56 IST2015-12-20T23:49:17+5:302015-12-20T23:56:24+5:30
औरंगाबाद : ‘मुलांना गणिताची सूत्रे शिकविताना फक्त ठराविक आकडे सूत्रात टाकून ते चालवायला न शिकविता, ते सूत्र तेथे का आले? त्याचा वापर कसा करावा,

यशस्वी होण्यासाठी योग्य करिअर निवडावे
औरंगाबाद : ‘मुलांना गणिताची सूत्रे शिकविताना फक्त ठराविक आकडे सूत्रात टाकून ते चालवायला न शिकविता, ते सूत्र तेथे का आले? त्याचा वापर कसा करावा, याबाबत माहिती द्या. मुलांना जर सगळे आयते पुरवत गेलात तर त्याचा ‘रोबोट’ होईल, पण जर त्याला त्या गोष्टीमागची संकल्पना समजावून दिली तर तो ‘स्मार्ट’ बनेल’, असे मत संकल्प फाऊंडेशनचे संचालक रजत पाणी यांनी उपस्थित पालकांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले. लोकमत कॅम्पस क्लब आणि संकल्प फाऊंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
लोकमत भवन येथे रविवारी संध्याकाळी झालेल्या कार्यक्रमात ‘फाऊंडेशन कोर्सेस तुमच्या मुलाला काय बनवणार? ‘इंटेलिजेन्ट रोबोट’ की ‘स्मार्ट ह्युमन’ याबाबत विद्यार्थी आणि पालक यांच्याशी संवाद साधताना रजत पाणी म्हणाले, मुलांना मासा हातात न देता, तो कसा पकडावा याबाबत माहिती द्या. रट्टा मारायला न शिकविता मुलांची कल्पनाशक्ती विकसित करणे ही आजच्या काळाची गरज आहे. मुलांची आवड कशात आहे, हे ओळखून त्यांना त्यांच्या आवडीचे करिअर शोधण्यासाठी मदत करणे अत्यंत आवश्यक आहे. आपला मुलगा विज्ञान शाखेत न जाता कला शाखेकडे जात असल्यास मुलाला त्यासाठी प्रोत्साहन द्या. सगळे जात आहेत म्हणून आपणही बळजबरीने आपल्या पाल्याला त्या दिशेने पाठविणे योग्य नाही. त्याला त्याच्या आवडीचे क्षेत्र न मिळाल्यास मुलांची प्रगती होणे अशक्य असल्याचे त्यांनी सांगितले. व्यवस्थापन, समाजशास्त्र, कलाक्षेत्र, कायदेविषयक अभ्यास इ. क्षेत्रांविषयी त्यांनी मुलांना माहिती दिली. या विषयांवरील चांगले अभ्यासक्रम कुठे उपलब्ध आहेत, त्याची प्रवेश परीक्षा आणि अभ्यासक्रम याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. संकल्प फाऊंडेशनचे समूह संचालक आकाश जाधव यांनी त्यांच्या आयुष्यातील अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले. स्पर्धा परीक्षांबद्दल माहिती देताना जाधव यांनी बोर्ड अभ्यासक्रम आणि स्पर्धा परीक्षा यांच्यातील फरक विद्यार्थ्यांना समजावून सांगितला.
संकल्प फाऊंडेशनचे श्रेयांश दुग्गर यांनी येणाऱ्या संधींचा फायदा घेण्याचा अनमोल सल्ला विद्यार्थ्यांना दिला. ते म्हणाले, ‘इयत्ता ७ वी ते १० वी हा आपल्याला आयुष्यात नेमके काय करायचे आहे, ते समजून घेण्यासाठीचा योग्य काळ आहे. आजचे पालक मुलांना काय करायचे आहे, ते समजून घेतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनो, तुमच्या आवडींविषयी पालकांना मोकळेपणाने सांगा. या वयात वेगवेगळ्या गोष्टींना अजमावून पाहा.’ सचिन तेंडुलकर, ए. आर. रेहमान आदींची उदाहरणे देऊन त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या आवडीलाच आपले करिअर बनविण्याचा सल्ला दिला. ‘क्षेत्र कोणतेही निवडा, पण जे निवडाल त्यात सर्वाेच्च पदावर जा’ असेही त्यांनी विद्यार्थ्यांना आवर्जून सांगितले. कार्यक्रमाला लोकमतचे सहायक उपाध्यक्ष शैलेश चांदीवाल तसेच वरिष्ठ व्यवस्थापक (आय. टी.) विलास झाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
लोकमत आणि संकल्प फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘लिटमस टेस्ट-२०१५’ स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :
इयत्ता ९ वी- प्रथम- निशा जोशी- एसबीओए शाळा
द्वितीय- प्रथमेश प्रधान- एसबीओए शाळा
तृतीय- अन्विशा मुगल- वाय. एस. खेडकर
इयत्ता ८ वी- प्रथम- विवेक वीर - देवगिरी ग्लोबल अकॅडमी
द्वितीय- अभा दुर्गपुरोहित- बीएसजीएम स्कूल
तृतीय - रोहित आरोळे - नाथ व्हॅली
इयत्ता ७ वी- प्रथम- गौरव कासलीवाल- अग्रसेन विद्यामंदिर
द्वितीय- विराज रोडगे- स्टेपिंग स्टोन्स स्कूल
तृतीय- प्रथम कलगुटकर - देवगिरी ग्लोबल अकॅडमी
प्रथम पारितोषिक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना टॅब्लेट देण्यात आले. द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकल तर तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना मनगटी घड्याळ देण्यात आले.